रांजणगावात (स्व) बाबूराव दौंडकर स्मारक समिती नवीन संकुलाचे उदघाटन
रांजणगाव गणपती – शेतकरी हा करोडो लोकांना अन्न देण्यासाठी शेती करतो. हे लक्षात ठेवा त्याचबरोबर आपल्या देशात शेतकरीराजा होता. आताही राजा झाला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व्ही. भागय्याजी यांनी व्यक्त केले.
रांजणगाव गणपती येथील माजी आमदार (स्व) बाबूराव दौंडकर स्मारक समिती नवीन संकुलाचे उदघाटन व वेबसाइटचे लोकार्पण राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य व्ही. भागय्याजी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च आणि तांत्रिक शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघसंचालक नानासाहेब जाधव, संभाजी गवारी उपस्थित होते.
भागय्याजी म्हणाले की, केंद्र शासन सेल्फ हेल्प ग्रुपकरिता ७५ हजार कोटी रुपये खर्च करते. यातून आर्थिक परिस्थिती वाढली अशी आकडेवारी दिसत नाही. याचात सरकारचा दोष नाही. सरकारला हे जे मॉडेल देण्यात आले आहे हे पाश्चात्य आहे. हे आपल्या देशाचे मॉडेल नाही. आताही हेच मॉडेल चालू आहे. या सेल्फ हेल्प गुपमधील महिलांनी उत्पादक बनले पाहिजे. सामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती बदलली पाहीजे. भारत हा ग्रामीण देश असून ग्रामीण देशच राहिला पाहिजे. जमीन ही केवळ एक तुकडा नसून ती माता आहे. तिचे शोषण नको तर पोषण आवश्यक आहे. पाण्याचे दुरूपयोग नको.
सर्व देशात शेती करणा-यांस कोणी मुलगी देत नाही. गरीब आणि श्रीमंत दरी वाढत आहे. गावामध्ये हार्डवर्क करणा-यांचे मोटिव्हेशन केले गेले पाहिजे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, (स्व) बाबूराव दौंडकर यांनी ग्रामविकासाचे स्वप्न पाहिले ते पूर्ण करणे हे बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे काम आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना राबविली. त्याकरिता साडेआठ कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. हजारो गावांची पाण्याची पातळी वाढली. यावेळी पाहुण्यांचा परिचय समारक समितीचे उपाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी करुन दिला. विठ्ठल वाघ यांनी आभार मानले.
शेतकरी हक्काचे मार्गदर्शन केंद्र
स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे म्हणाले की, रांजणगाव येथे स्मारक समिती मागील २५ वर्ष ग्राम व कृषी विकासाचे कार्य करीत आहे. समितीची एक एकराची जमीन आहे. स्थानिक शेतक-यांसाठी हक्कांचे सल्ला मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र याठिकाणी व्हावे या दृष्टीने स्मारक समिती काम करते. पाणी, माती परीक्षण केंद्र, शेतीविषयक मार्गदर्शक कार्यक्रम, मेळावे, मार्गदर्शन, परिसंवाद, प्रयोग प्रात्यक्षिके, कृषी ग्रंथालय, प्रशिक्षण हॉल, गोवंश संवर्धन, आरोग्यविषयक मार्गदर्शन, कुटुंब सल्ला मार्गदर्शन केंद्र, स्वयंरोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण, सेंद्रीय शेतीमाल विक्री केंद्र, आजारी जनावरांसाठी फिरते वाहन, गट शेती आदी उपक्रम समितीमार्फत केले जातात. जल, जमीन, जंगल, जनावर हे निकष धरुन चार गावे ग्रामविकासा करिता संस्थेने निवडली आहेत.