राजगुरूनगरातून मिशन 48 शिवसंकल्प अभियान सुरू
राजगुरूनगर – येणार्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीच्या जागा निवडून आणल्या पाहिजेत. विरोधकांकडे विरोध करण्यासाठी काहीच शिल्लक उरले नाही. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आम्ही काही बोललो तर त्यांना पाळता भुई कमी होईल. खोट्याच्या कपाळी गोटा ही म्हण खरी करायची आहे. खोट बोलून शिवसैनिकांचा अपमान केला. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. कोविड काळात मयताच्या टाळूवरचे लोणी खाणार्यांनी आम्ही काय केले हे आम्हाला शिकवू नये, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
मिशन 48 शिवसंकल्प अभियान सुरुवात व कार्यकर्ता मेळावा राजगुरूनगर येथे शनिवारी (दि. 6) झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, इरफान सय्यद, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, शीतल म्हात्रे, मिना कांबळी, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, संघटक अशोक भुजबळ, तालुका प्रमुख राजू जवळेकर, आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याला महिलांची संख्या मोठी होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नारळ फोडून मिशन 48 शिवसंकल्प अभियानाची सुरुवात केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुणे जिल्ह्यात रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला होता त्याच पुणे जिल्ह्यात शिवसंकल्प अभियानाचा आपण शुभारंभ करत आहोत. असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोणताही संकल्प पूर्ण करायचा असेल तर त्याला जिद्द लागते मेहनेत कष्ट आणि निर्धार लागतो तो निर्धार करण्यासाठी त्यासाठी झोकून देण्याची वृत्ती लागते ही शिकवण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. लढाऊ बाणा दिला.
अन्यायावर मात करण्यासाठी शिकवण दिली व अन्याय विरोधात पेटून उठण्याची शिकवण दिली सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठी लढण्याची शिकवण दिली तो बाळासाहेबांचा वारसा शिवसैनिकांनी जपला पाहिजे. खोट बोलून ज्यांनी आपल्याच माणसांचा विश्वास घात केला. जनतेचा विश्वास सार्थ केल्याशिवाय एकनाथ शिंदे राहणार नाही. राज्यात मिशन 48 संकल्प अभियान यशस्वी करण्यासाठी एक शिवदूत म्हणून आपण करायचे आहे.आपली घोषणा अबकी बार 45 पार असे ते म्हणाले. सूत्रसंचालन योगिता पाचारणे यांनी केले.
पंतप्रधानांचे हात बळकट करायचे
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 48 पैकी 45 जागा निवडणून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करू असा संकल्प आज आम्ही करीत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
‘त्या’साठी वाघाचे काळीज लागले
शिवसेना वाचविण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी हे धाडस मी केले आहे. हे जगातील अनेक देशातील लोकांनी पहिले आहे ते करण्यासाठी धाडस आणि वाघाचे काळीज लागले, पुढे काय होईल याची पर्वा केली नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मुख्यमंत्री पदाचा वापर,सत्तेचा वापर झाला पाहिजे. प्रत्येक नागरिकांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे अशी भावना असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.