शिक्षक समन्वय समितीची मागणी : निवडणूक कामाचा परिणाम नको
टाकळी हाजी – येत्या वर्षात होणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा या निवडणुकीमध्ये कर्मचारी म्हणून अपंग, दुर्धर आजार तसेच महिला शिक्षकांना निवडणुकीचे काम न देता या कामातून त्यांना वगळावे, अशी मागणी शिरूर तालुका समन्वय समितीच्या वतीने तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देत करण्यात आली.
निवडणुकीचे काम देताना फक्त शिक्षक हा वर्ग मोठ्या प्रमाणात घेतला जातो. इतर क्षेत्रातील सरकारी कर्मचारी असताना शिक्षकांमधून 100 टक्के कर्मचारी यांची नेमणूक केली जाते. त्यात असणारी प्रशिक्षण, व इतर कामाचे दिवस धरून आठ दिवस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. महिला शिक्षकांना मतदान केंद्रावर मुक्कामी राहावे लागते. राहण्याची सोय नसते. अडचणीच्या ठिकाणी राहणे हे गैरसोयीचे आहे. अनेक अडचणींना सामोरी जावे लागते.
असे जिल्हा नेते शिवाजी वाळके यांनी सांगितले. महिला शिक्षक, व आजारी, अपंग शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी शिक्षक नेते माऊली पुंडे, तालुकाध्यक्ष संतोष गावडे यांनी केली.
शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकिंग, माध्यमिक, उच्च शिक्षण विभाग, सहकार, पंचायत विभाग, बांधकाम विभागासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना देखील या कामकाजात समाविष्ट करण्याची मागणी शिक्षक नेते अविनाश चव्हाण यांनी केली.
यावेळी शिक्षक नेते शिवाजी वाळके, माऊली पुंडे, अविनाश चव्हाण, बबन म्हाळसकर, संतोष शेवाळे उपस्थित होते. यावेळी मागण्यांबाबत योग्य विचार करण्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आश्वासन दिले.