अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनू गोयल यांची माहिती
पुणे – शहरातील सगळा कचरा येत्या दोन दिवसांत उचलण्यात येणार असल्याचे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनू गोयल यांनी सांगितले. देवाची उरळी ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे. “रिजेक्ट’ टाकायला आम्हाला मनाई नसल्याचे डॉ. गोयल यांनी सांगितले.
तांत्रिक अडचणींमुळे हडपसर येथील दोन प्रक्रिया प्रकल्प बंद पडल्याने शहरात साठलेला कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही प्रकल्पातील दुरुस्ती अंतिम टप्प्यात असून, नवीन प्रकल्पही कार्यन्वित केल्याने येत्या काही दिवसांत कचऱ्याची समस्या कमी होईल, असे डॉ. गोयल म्हणाले.
देवाची उरुळी येथील ग्रामस्थांनी शहरातील मिश्र कचरा आणि प्रक्रिया प्रकल्पांवरील रिजेक्ट कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रकल्पामध्ये टाकण्याला विरोध केला आहे. अशातच हडपसर येथील “रोकेम’ आणि “दिशा’ कंपनीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या दोन प्रकल्पांमध्ये अनुक्रमे आग आणि पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मागील काही दिवसांत शहरात कचऱ्याचे ढीग साठू लागले होते. अशातच सलग होणाऱ्या दमदार पावसामुळे दुर्गंधी आणि कचरा पावसाळी गटारांमध्ये अडकत असल्याने रस्ते जलमय होत आहेत.
दोन प्रकल्पातील बिघाडामुळे शहरात साठलेल्या कचरा उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हे दोन्ही प्रकल्प लवकरच कार्यन्वीत केले जातील. तसेच शहरातील विविध भागात नव्याने उभारण्यात आलेले तीन प्रकल्प कार्यन्वित करण्यात आल्याने तेथे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांत या तिन्ही प्रकल्पांची क्षमता वाढवण्यात येईल. तसेच हरित लवादाच्या आदेशानुसार देवाची उरुळी येथील कचरा डेपोमध्ये रिजेक्ट नेण्यास काहीच अडचण नाही. यासंदर्भात ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे डॉ. गोयल यांनी सांगितले.