चिंबळी (ता. खेड) : अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे.
चिंबळी – खेड तालुक्याच्या दक्षिण भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातच शनिवारी (दि. 6) सायंकळी 8 वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असल्यामुळे रब्बी हंगामातील निसवणीस आलेले ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे.
चिंबळ (ता. खेड) येथील प्रगतिशील शेतकरी शिवनाथ काशिनाथ जैद यांनी गेल्या अडीच महिन्यांपूर्वी 20 हजार रुपये खर्च करून सुमारे अडीच एकरमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची पेरणी केली होते. त्यांनी वेळेवर औषध फवारणी, खुरपणी करून खत पाणी घालून चांगल्या प्रकारे पिकाची निघा राखल्याने ज्वारीचे पीक हिरवेगार होऊन निसवणीस आले होते.
त्यातच वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने शेतकर्यांनी औषध फवारणी करण्यास सुरुवात केली होती. त्यातच शनिवारी रात्री आठच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांसह शेतकर्यांची तारांबळ उडाली होती. या पावसामुळे ज्वारीचे पीक भुईसपाट झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.