पुणे – ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी मागील तीन महिन्यांत मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. मात्र, आजही शहरापेक्षा ग्रामीण भागातील मृत्यूदर काहीसा वाढलेलाच आहे. मेमध्ये ग्रामीण भागातील मृत्यूदर तब्बल 12 टक्के होता. तर मागील तीन महिन्यांत हे प्रमाण 3.38 टक्क्यांपर्यंत घटले आहे. आता हे प्रमाण 2.7, तर शहरातील मृत्यूदर 2.3 टक्के आहे.
शहरात करोनाचा पहिला बाधित सापडल्यांनतर ग्रामीण भागातील सर्व प्रवेश बंद करण्यात आले. त्यामुळे पहिल्या महिनाभरात ग्रामीणमध्ये केवळ 14 बाधित होते. तर त्याचवेळी शहरातील बाधित संख्येत लक्षणीय वाढ झाली. दरम्यान, 3 मे रोजी ग्रामीणमध्ये 50 बाधित संख्या असली, तरी त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला. जूनपासून जशी बाधितांची संख्या वाढू लागली.
1 जून ते 14 सप्टेंबर जवळपास साडेतीन महिन्यांत ग्रामीणमध्ये तब्बल 37 हजार 431 बाधित सापडले. त्यामध्ये 19 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या एकाच महिन्यात 24 हजार 98 बाधित सापडले. त्या तुलनेत मृत्यूही मोठ्या प्रमाणात वाढले.
पुरंदर आणि जुन्नर तालुक्यांचा मृत्यूदर सर्वाधिक
मृत्यूदाराचे सर्वाधिक प्रमाण पुरंदर आणि जुन्नर तालुक्यांत आहे. पुरंदरमध्ये 808 बाधित सापडले असून, त्यातील 592 बाधित करोनामुक्त झाले आहेत. तर 174 जणांवर उपचार सुरू आहेत. 42 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यात 1 हजार 412 बाधितांपैकी 1 हजार 159 जण करोनामुक्त झाले आहेत.
तर 180 जणांवर उपचार सुरू आहेत. 73 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून. या दोन्ही तालुक्यांतील मृत्यूदर सर्वाधिक 5.2 टक्के इतका आहे. तर ज्या तालुक्यात सर्वाधिक बाधित संख्या आहे, त्या हवेली तालुक्यात मृत्युदर सर्वात कमी 1.8 टक्के इतका आहे.