राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा माजी हर्षवर्धन पाटील यांना टोला
भवानीनगर – ज्यांनी मंत्री म्हणून 19 वर्षे काम केले त्यांच्या काळात इंदापूर तालुक्याचा काय विकास झाला, हे जनतेला माहित आहे. गटर लाईन, रस्ते व इतर विकास कामे झाली का? त्यांनी मंत्री म्हणून इंदापूर तालुक्यासाठी चांगले काम केले असते तर लोकांनी मला निवडून दिले नसते. झालं ते बरंच झालं आहे समाजाची सेवा करण्याची संधी मला मिळाली, अशी टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील लाकडी, काझड, अकोले या भागातील 13 कोटी 66 लाख रुपयांच्या विकासकमांचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काझड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. भरणे म्हणाले अधिवेशनामध्ये लाकडी, निंबोडी पाणी योजना संदर्भात निर्णय झाला असून 10 हजार 845 एकराला मंजुरी दिली आहे. काझड, शिंदेवाडीचे क्षेत्र या योजनेमध्ये येत आहे काझडचे क्षेत्र 1283 शिंदेवाडी 1357 असे मिळून अकरा हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येत असून साधारण 340 कोटी रुपये या योजनेसाठी खर्च येत आहे.
यामुळे लाकडी निंबोडी, अकोले, शिंदेवाडी निरगुडे तसेच इतरही भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यावेळी काझड गावातील नागरिकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, सदस्य हनुमंत बंडगर, इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, पंचायत समिती सदस्या शितल वणवे, णजित निंबाळकर, पांडुरंग दराडे, बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, तानाजी पाटील, सुभाष झगडे, विक्रम निंबाळकर काझडचे सरपंच अजित पाटील, उपसरपंच राजू मोरे, लाकडीचे सरपंच द्रोपदाबाई वनवे, उपसरपंच अनिल गायकवाड, अकोल्याचे सरपंच नकुशा दराडे, उपसरपंच संदीप दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वीजबिल भरण्याचा प्रयत्न करावा
सध्या शेतकऱ्यांपुढे विज बिल भरण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी पैसे बुडवणार नाहीत. शेतात जुलैपर्यंत उसतोड चालू राहणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने अडचण आहे अशा शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय थोड्या दिवसात घेतला जाईल. परंतु सध्या विज निर्मितीसाठी कोळशाचे संकट मोठ्या प्रमाणात आहे. जुनी माणसे शेतातील विजेचे बिल तातडीने भरत होते तेच योग्य होते. सध्या शेतकऱ्यांसाठी वीज वितरण विभागाने दिलेल्या योजनेप्रमाणे बिल भरण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन भरणे यांनी केले.
वेळेवर कर्ज भरणाऱ्यांना मदत
राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद केली असून, यात अनेक यांजनांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारने 50 हजार राज्य शासनाच्या वतीने जाहीर केले होते, ते लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे.