सासवड (ता. पुरंदर) : नगरपालिकेच्या वतीने विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार संजय जगताप, नागरिक.
सासवड – मला श्रेयवादाची लढाई कोणाबरोबरच करायची नाही, माझे विकासकामे करण्याकडे लक्ष असते. भूमिपूजनांच्या कार्यक्रमांना गेल्यामुळे परिसरातील नागरीकांकडून इतर समस्यांची माहिती मिळते. तसेच विरोधकांनी केवळ श्रेय न घेता त्याबरोबर विकासकामांची जबाबदारी घेणे महत्त्वाचे असल्याचा टोला पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी लगावला.
सासवड नगरपालिकेच्या हद्दीत नगरोत्थान, महाराष्ट्र सुवर्ण जयंती, डीपीडीसी, वैशिष्ट्यपूर्ण योजनांतून शहराच्या परिसरातील विविध 15 ठिकाणी सुमारे 5 कोटी 62 लाख रुपयांच्या रस्तांच्या कामांची भूमिपूजने रविवारी (दि. 17) आमदार जगताप यांच्या उपस्थितीत आणि परिसरातील नागरीक आणि माजी नगरसेवकांच्या हस्ते झाली. यावेळी आमदार जगताप यांनी, सासवडकर जनता नेहमी विकासकामांत साथ देत असून यापुढेही विकासाला साथ देत राहिल. नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पालिका प्रशासन काम करीत आहे, असे नमूद केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष पोपटराव जगताप, सुहास लांडगे, यशवंतकाका जगताप, अजित जगताप, संजय ग जगताप, संदीप जगताप, विजय वढणे, मनोहर जगताप, प्रविण भोंडे, सारिका हिरामण हिवरकर, नंदकुमार जगताप, प्रमोद बोरावके, संतोष गिरमे, योगेश गिरमे, रोहित इनामके, संतोष खोपडे, मनोज म्हेत्रे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे, संतोष जगताप, तुषार जगताप, अनिल जगताप, बाळासाहेब राऊत, लालासो जगताप, प्राचार्य ईस्माईल सय्यद, रविंद्रपंत जगताप, चेतन महाजन, प्रदीप राऊत, सागर जगताप तसेच पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी व नागरीक उपस्थित होते.
जनतेचे म्हणणे महत्त्वाचे
कोण काय म्हणते यापेक्षा जनता काय म्हणते, पाहते हे महत्त्वाचे आहे. विरोधक पूर्वी मंजूर कामांची पत्र मिळवून आता सोशल मीडियावर टाकून श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न करतात; मात्र ती कामे मंजूर होऊन त्यासाठी निधीही आलेला असतो याची त्यांना माहिती नसते, त्यामुळे कोणी कितीही टीका करो, मी त्याकडे लक्ष न देता विकासकामे करत राहणार, अखेर जनता महत्त्वाची असल्याचे आमदार संजय जगताप यांनी नमूद केले.