लोणी धामणी -आंबेगाव तालुक्यात विविध कार्यकारी सोसायटीचे पीककर्ज नियमितपणे भरणाऱ्या जवळपास 15 हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अजूनही पन्नास हजारांचा लाभ देण्यात
आला नाही.
नेहमीच पीककर्जाची रक्कम थकवणाऱ्या शेतकऱ्यांनाच सरकार मदत करते. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर करूनही अजून मदत न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरणारे शेतकरी लवकरच मंचर येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत, असा निर्वाणीचा इशारा लोणी गावचे माजी सरपंच उद्धव लंके यांनी दिला आहे.
या संदर्भात लवकरच नियमित कर्जदार शेतकऱ्यांची बैठक मंचर येथे आयोजित करून पुढील धरणे आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. थकित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात मात्र “वाटाण्याच्या अक्षता’ हा शासनाचा कुठला न्याय, अशी भावना त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
सरकारने जाहीर केलेली मदत वेळेत दिली तर शेतकरी रस्त्यावर उतरणार नाहीत. मात्र, येत्या आठ दिवसांत या संदर्भात सरकारी स्तरावर कुठलाही ठोस निर्णय न झाल्यास धरणे आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा लंके यांनी दिला आहे.