पुणे : जिल्ह्यातील दौंड परिसरात राहणाऱ्या मल्हारी नामदेव बारवकर या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळत नसल्याने मल्हारी नामदेव बारवकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मल्हारी दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील रहिवासी आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी मल्हारीने सर्व गोष्टींबाबत त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे. आत्महत्येसाठी कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसल्याचे मल्हारीने म्हटले आहे. त्याने या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की,’मी तुम्हाला दाखवलेलं स्वप्न आता पूर्ण करू शकत नाही आणि तुमचे पडलेले चेहरेही पाहू शकत नाही. आत्महत्येस जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यातही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगलं जगण्याच्या सगळ्या आशा संपल्या आहेत, सॉरी” अशा भावना या सुसाईड नोटमध्ये मल्हारीने व्यक्त केल्या आहेत.’
दरम्यान,मल्हारी हा गरीब कुटुंबातून असून, त्याचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात मैलकोली आहेत. नैराशातून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती कुटुंबातील व्यक्तींनी दिली आहे. मल्हारने लिहिलेली सुसाईड नोट त्याच्या नातेवाईकांना मिळाली आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनीदेखील मल्हारीचा सुसाईड नोटबद्दल दुजोरा दिला आहे.