पुणे- बहुसंख्य शाळांत टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षकही कार्यरत आहेत. या काहींनी “टीईटी’ उत्तीर्णतेची बोगस प्रमाणपत्रेच तयार केली आहेत. या पात्र-अपात्र शिक्षकांची माहिती शिक्षण संचालक कार्यालयास सादर करण्यास राज्यातील शिक्षणाधिकारीच “नकारघंटा’ दर्शवत आहेत.
शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी “टीईटी’ उत्तीर्ण होणे 13 फेब्रुवारी 2013 पासून बंधनकारक आहे. तर, सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. 31 मार्च 2019 ही त्यासाठी अंतिम मुदत होती. या कालावधीतही फारशा शिक्षकांना “टीईटी’ उत्तीर्ण होता आलेले नाही. यामुळे आठ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली होती. दरम्यान, शासनाने “टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबवावे व त्यांना सेवेतून काढून टाकण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणीच झाली नाही.
बोगस प्रमाणपत्रासाठी एजंटाचे रॅकेट
“टीईटी’ची बोगस प्रमाणपत्रे तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याच्या अनकेदा तक्रारी झाल्या होत्या. दरम्यान, परीक्षा परिषदेने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळांमधील शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करण्याचे आदेश अनेकदा बजावले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत केवळ 493 प्रमाणपत्रे दाखल झाली. यात मुंबई-4, नाशिक-1, औरंगाबाद-1 अशी बोगस प्रमाणपत्रे आढळली. “टीईटी’ च्या सहा परीक्षांमध्ये एकूण 86 हजार 298 उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत. मात्र, तुलनेत पुरेशी प्रमाणपत्रे पडताळणी झालेलीच नाही.