पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेला गुरुवारी (दि.2) उत्साहात सुरुवात झाली. विविध ठिकाणच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करत गुलाब पुष्प देवून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
राज्यातील नऊ विभागीय मंडळात एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यात 8 लाख 44 हजार 116 मुले तर 7 लाख 33 हजार 67 मुलींचा समावेश आहे. 5 हजार 33 केंद्रावर ही परीक्षा सुरू झालेली आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात परीक्षेसाठी देण्यात आलेल्या सवलती यंदा रद्द करण्यात आलेल्या आहेत. यंदा प्रचलित पध्दतीनुसार दहावीची परीक्षा सुरू करण्यात आली आहे. 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षेला सुरुवात झालेली आहे. दहावीची ही परीक्षा 25 मार्चला संपणार आहे.
परीक्षा केंद्रावर सकाळी वेळेपूर्वीच विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परीक्षा केंद्रावर मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. रेणुका स्वरुपसह अन्य विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत परीक्षा कक्षात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची झडती घेण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वेळेवरच देण्यात आल्या.
राज्यात कॉपीची 9 प्रकरणे
दरम्यान परीक्षेच्या पहिल्याच दिवशी प्रथम भाषेचा पेपर झाला. यात मराठी, हिंदी, उर्दू, गुजराथी, कन्नड, तमिळ, तेलगू, सिंधी, बंगाली या भाषांचा समावेश होता. पहिल्या पेपरला कॉपी करताना 9 विद्यार्थी सापडले आहे. पुणे विभागात 5, नागपूरमध्ये 2, अमरावतीत 1, नाशिकमध्ये 1 याप्रमाणे कॉपीची प्रकरणे आढळून आलेली आहेत.