पुणे : आपली परंपरा खूप मोठी असताना ती त्याच ताकदीने पुढे नेण्याची जबाबदारीही पेलावी लागते. ती ताकद आपण निर्माण करू शकलो नाही तर भविष्यात परंपरेचा डोलारा कोसळून पडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे निव्वळ परंपरेवर अवलंबून न राहता काळानुसार बदलत राहीले पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी व्यक्त केले आहे.
बालभारतीच्या ५७व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, माजी संचालक वसंत पाटील, गोविंद नांदेडे, डॉ. शकुंतला काळे, भाऊ गावंडे, भारती देशमुख, उज्ज्वला ढेकणे, रवींद्र माने आदी उपस्थित होते.
शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा बालभारती हा पहिला हस्तस्पर्श असतो. ज्याचा ठसा मनावर चिरकाल उमटतो, असे प्रतिपादनही सूरज मांढरे यांनी केले.
बालभारतीमध्ये काही वर्षे नोकरी करणे हा आयुष्यातील सुंदर अनुभव होता. इथे येऊन अनेक दिग्गजांच्या सहवासात जीवनाला आकार मिळाला. कोट्यवधी विद्यार्थ्यांवर बालभारतीचे ऋण आहेत. बालभारती हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. या संस्थेचा सर्वांनाच अभिमान आहे, असे गोविंद नांदेडे यांनी सांगितले. यावेळी बालभारतीमधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.