संतोष पवार
सातारा – जिल्ह्याने स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान, हागणदारी मुक्त गाव योजनेमध्ये देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. आता स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा क्रमांक 2 अंतर्गत जिल्ह्यात उठावदार काम होत आहे. जिल्ह्यात 155 सार्वजनिक शौचालय युनिटसाठी 3 कोटी 25 लाख 5 हजार रुपये तर वैयक्तिक 2 हजार 932 शौचालयासाठी 3 कोटी 50 लाख 52 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, हागणदारी मुक्त गाव अभियानात जिल्ह्यातील अनेक गावे देशात, राज्यात चमकली आहेत. जिल्हा परिषदेचा व जिल्ह्याचा नावलौकिक कायम राहावा यासाठी जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यासाठी विविध अभियान, उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांची गावे, जास्त वर्दळीची,
बाजाराची गावे, मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये सार्वजनिक शौचालय युनिटसाठी तीन लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. एक लाख 26 हजार रुपये केंद्र सरकार, 84 हजार रुपये राज्य सरकार व संबंधित ग्रामपंचायकडून 90 हजार रुपये असा हा निधी उपलब्ध करण्यात येत आहे. यावर्षी 155 सार्वजनिक शौचालय युनिटचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी 3 कोटी 25 लाख 5 हजार रुपयांचा निधी तालुकास्तरावर वितरित करण्यात आला आहे. दि. 31 मार्च अखेर ही कामे पूर्ण झाली आहेत. सातारा तालुक्यात 8, कोरेगाव 15, खटाव 9, माण 15, फलटण 15, खंडाळा 18, वाई 15, जावळी 12, महाबळेश्वर 14, कराड 9, पाटण 25 अशी 155 सार्वजनिक शौचालये मंजूर करण्यात आली होती.
जिल्ह्यात वैयक्तिक शौचालयाचे 2 हजार 932 उद्दिष्ट असून प्रती शौचालय 12 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यासाठी 3 कोटी 50 लाख 52 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीचे तालुकास्तरावर वितरण करण्यात आले. केंद्र सरकार 60 व राज्य सरकार 40 टक्के निधी देत आहे. सातारा तालुका 379, कोरेगाव 363, खटाव 213, माण 535, फलटण 150, खंडाळा 210, वाई 284, जावळी 358, महाबळेश्वर 179, कराड 167, पाटण 94 अशा 2 हजार 932 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालयांची कामे पूर्ण झाली असून त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आल्याचे सायमोते यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, हागणदारी मुक्त गाव अभियानात देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. स्वच्छ भारत मिशनमध्येही जिल्हा देशात चमकेल यादृष्टीने काम सुरु आहे. याकामी नागरिक, विविध सामाजिक संघटना प्रशासनाला सहकार्य करत आहेत.
विनय गौडा, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी