आळंदीत कार्तिकी यात्रेस प्रारंभ ः गुरु हैबतराव बाबांच्या पायरीचे पूजन
एम. डी. पाखरे
आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास बुधवार (दि. 22) पासून प्रारंभ झाला. प्रथापरंपरेनुसार पालखी सोहळ्याचे जनक गुरू हैबतराव बाबा यांचे वंशज बाळासाहेब निवृत्ती आरफळकर-पवार व राजेंद्र आरफळकर-पवार यांच्या हस्ते बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या गजरात मुख्य महाद्वारातून मंदिरात प्रवेश करतानाची पहिली मानाची गुरु हैबतराव बाबांच्या पायरीचे पूजन करण्यात आले.
मानकऱ्यांच्या दिंडीतील अभंग विविध देवतांच्या आरत्या व देवा ब्राह्मणांच्या साक्षीने माउलींच्या 724व्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ करण्यात करण्यात आला. पायरी पूजनप्रसंगी समस्त आरपळकर कुटुंबीय, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, डॉ. अजित कुलकर्णी, माउलींचे चोपदार हभप कृष्णराव चोपदार, भाऊसाहेब फुरसुंगीकर, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, डी. डी. भोसले पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक,
नगरसेवक संतोष गावडे, पोलीस नाईक, मच्छिंद्र शेंडे, मारुती महाराज कोकाटे, मानकरी दिनेश कुऱ्हाडे, बाळासाहेब कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, माउली गुळुंजकर यांच्यासह भाविक उपस्थित होते. पायरी पूजनाप्रसंगी मंत्रोपचार व धार्मिक विधी मोरेश्वर जोशी व इतर ब्रह्मवृंदानी केले. पहाटे पवमान अभिषेक व दुधआरती, सकाळी भाविकांच्या महापूजा हे नित्य कार्यक्रम उरकल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता मुख्य महाद्वारासमोर असलेल्या हैबतबाबांच्या पायरीचे पूजन विधीवत मंत्रोपचार करत हैबत बाबांचे वंशज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर-पवार, राजेंद्र आरपळकर व राजेंद्र आरफळकर यांच्या वतीने नारळ-प्रसादाचे वाटप काण्यात आले. दरम्यान, रात्री धूप आरती व हभप योगीराज ठाकूर, बाबासाहेब आजरेकर यांच्या तर्फे कीर्तनसेवा, रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत हैबतबाबा पायरी समोर हभप वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, हैबतबाबा आरफळकर यांच्यातर्फे हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रमांनी सोहळ्याच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
भाविकांच्या दिंड्यांचा ओघ सुरू
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा प्रत्यक्ष नेत्रसुखाने अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांच्या दिंड्यांचा ओघ सुरू झाला असून, अवघी अलंकापुरीच भक्तीरसात चिंब होऊ लागली आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा भाविकांच्या सुख-सुविधेसाठी सज्ज झाल्या आहेत. आजपासून आळंदीतील विविध मठ, मंदिरे, धर्मशाळांमध्ये व मोकळ्या जागेत राहुट्या उभारून सर्वत्र अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात झाली असल्याने पुढील सहा दिवस अलंकापुरीच हरिनामाच्या गजरात चिंब न्हाऊन निघणार आहे.
आजचे धार्मिक कार्यक्रम
गुरूवार (दि.21) रोजी पहाटे पवमान अभिषेक व दुधआरती,भाविकांच्या महापूजा, दुपारी महानैवेद्य, सायंकाळी हभप बाबासाहेब देहूकर यांच्यातर्फे कीर्तनसेवा, रात्री धूपआरती व त्यानंतर रात्री 9 ते 11 वासकर महाराज यांच्यातर्फे कीर्तनसेवा असे कार्यक्रम होणार आहेत.