शेवगाव -करोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने जाहीर केलेले 20 लाख कोटीचे आर्थिक पॅकेज फसवे असल्याची टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव ऍड. सुभाष लांडे यांनी येथे केली.
केंद्र सरकारच्या निष्ठुरते विरोधात व शेतकरी, कष्टकरी, मजूरांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आज शेवगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते
ऍड. लांडे म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारला देय असलेली अर्थिक थकबाकी त्वरीत द्यावी. कोव्हीड 19 महामारीच्या काळात अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दरमहा 10 हजाराची मदत द्यावी. तसेच सर्व पत्रकार व छायाचित्रकार यांना दरमहा 10 हजार रूपये निर्वाह भत्ता द्यावा, स्थलांतरीत मजूरांसाठी अधिकाधिक बस, रेल्वे पुरवून खाण्या-पिण्यासह प्रवासाची मोफत सुविधा व प्रत्येकी 10 हजार रूपये निर्वाह भत्ता द्यावा.
यावेळी संजय नांगरे, बाजार समितीचे संचालक अशोक नजन, बापूराव राशिनकर, राम पोटफोडे, बबनराव पवार, आजम सय्यद आदींनी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन व लाल बावटा फडकावत निदर्शन आंदोलनात सहभाग घेतला. सर्व बेरोजगारांना निर्वाह भत्ता मिळावा, रेशन दुकानात अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व केशरी कार्ड असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना तांदुळ, गहू, साखर व डाळी मोफत मिळाव्यात, मजुरांसाठी मनरेगा योजनेत मजूरीची रक्कम व दिवस वाढवावेत, वृद्ध, विधवा आणि अपंगासांठी पेन्शन व विविध योजनांच्या रकमेत वाढ करावी अशा मागण्या करण्यात आल्या.