नवी दिल्ली –मोदी सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ या सशस्त्र दलांमधील नव्या भरती योजनेविरोधात देशाच्या विविध भागांत गुरूवारी निदर्शनांचा आगडोंब उसळला. प्रामुख्याने बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा ही राज्ये त्या निदर्शनांनी ढवळून निघाली. काही ठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.
बिहार आणि उत्तरप्रदेशात सलग दुसऱ्या दिवशी हिंसक निदर्शने झाली. बिहारमध्ये भाजपच्या दोन आमदारांना त्याची झळ पोहचली. एका महिला आमदाराच्या वाहनावर निदर्शकांनी दगडफेक केली. त्यामध्ये संबंधित आमदारासह पाच जण जखमी झाले. त्याशिवाय, बिहारमधील आणखी एका आमदाराच्या घरात तोडफोड करण्यात आली. त्या राज्यात रेल्वेचे काही डबे पेटवून देण्यात आले. काही रेल्वे रोखण्यात आल्या. तसेच, सार्वजनिक वाहनांची तोडफोड करण्यात आली. निदर्शकांना पांगवण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
विविध भागांतील निदर्शनांमुळे 34 रेल्वे रद्द करण्यात आल्या. तसेच, 72 रेल्वे विलंबाने धावल्या. अग्निपथ योजनेमुळे सशस्त्र दलांमधील भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातून निदर्शकांमध्ये बहुतांश प्रमाण युवकांचेच असल्याचे पुढे आले आहे. निदर्शनांना व्यापक स्वरूप आल्याने संबंधित योजनेचा फेरविचार करण्याविषयी मोदी सरकारवरील दबाव वाढल्याचे मानले जात आहे.