मुंबई -जागतिक आर्थिक परिस्थिती करोना व्हायरसमुळे लवचिक असल्यामुळे शेअरबाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा येणे चालूच आहे. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत येत आहेत. त्यामुळे भारतातील बरेच गुंतवणूकदार नफेखोरी करण्याच्या मनःस्थितीत आहेत.
त्यामुळेच कालच्या प्रमाणे आजही शेअरबाजाराच्या निर्देशांकांत बरीच घट झाली. औद्योगिक उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कमी असल्यामुळे धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे. त्याचबरोबर ग्राहक वस्तू आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरचीही विक्री करून गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत.
गुरुवारी राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.83 टक्क्यांनी म्हणजे 124 अंकांनी कोसळला व 14,906 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 337 अंकांनी कोसळला व 49,564 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, सन फार्मा, पॉवर ग्रीड, ऍक्सिस बॅंक, भारती एअरटेल, कोटक बॅंक या कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यासाठी विक्री केली.
मात्र, अशा परिस्थितीतही महिंद्रा, इंडसइंड बॅंक, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरची काही प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले. याबाबत बोलताना रिलायन्स सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आल्यानंतर भारतात नफेखोरी वाढत असल्याचे कालपासून दिसून येत आहे.
औद्योगिक उत्पादन वाढणार नसल्याचे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे धातू क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. चीनमध्ये वस्तूंच्या किंमत वाढीला रोखण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याचा परिणाम आशियाई शेअरबाजार निर्देशांकावर झाला. त्यामुळे भारतातही विक्री वाढली.