नवी दिल्ली – इन्फोसिस कंपनीने विकसित केलेले प्राप्तिकर पोर्टल सात जून रोजी जारी करण्यात आले होते. यामध्ये काही अडचणी आल्या आहेत. त्या अडचणी वेगाने कमी होत आहेत असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की हे पोर्टल प्रत्यक्षात सुरू करण्याअगोदर अर्थ मंत्रालय आणि इन्फोसिस कंपनीने प्रायोगिक पातळीवर बरेच व्यवहार केले होते. मात्र प्रत्यक्षात पोर्टल सुरू करण्यात आल्यानंतर देशातील काही करदात्यांना अडचणी येत आहेत. या अडचणी इन्फोसिस कंपनीला सांगितल्या आहेत. इन्फोसिस कंपनी युद्धपातळीवर या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
इन्फोसिस कंपनी, अर्थ मंत्रालय आणि चार्टर्ड अकाउंटंटची संघटना या अडचणी दूर करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करीत असून आता बरेच अडथळे कमी झाले आहेत. आगामी काळात लवकरच हे पोर्टल निर्दोषपणे काम करेल असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला.
अशा प्रकारची मोठी यंत्रणा भारतासारख्या मोठ्या देशात राबविली जाते त्यावेळी काही अडचणी येत असतात आणि आलेल्या अडचणीच्या आधारावर यामध्ये सुधारणा केल्या जात असतात असे सीतारामन म्हणाल्या. सुरुवातीला या पोर्टलबद्दल बऱ्याच तक्रारी येत होत्या. आता या तक्रारीची संख्या वेगाने कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.