IND vs AUS Final: गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 1 लाख 30 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये आज होणार्या रोमांचक सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स देखील सहभागी होणार आहेत. याशिवाय भाजपशासित अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यात सहभागी होण्याचे कार्यक्रम आहेत.
सामन्यासाठी पंतप्रधानांच्याउपस्थितीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव गट) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. भाजप सरकार या मेगा स्पर्धेला राजकीय कार्यक्रम बनवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी स्टेडियममध्ये पीएम मोदी आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हापासून सत्तेवर आले आहेत, तेव्हापासून प्रत्येक गोष्ट त्यांचा राजकीय कार्यक्रम बनला आहे. या देशात केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्येक गोष्टीवर राजकीय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. क्रिकेटमध्ये राजकारण करण्याची गरज नाही, पण अहमदाबादमध्ये हे केले जात आहे. ”
दरम्यान, “इथे पीएम मोदी गोलंदाजी करतील, अमित शहा फलंदाजी करतील आणि भाजप नेते सीमारेषेवर उभे राहतील, असे दिसते. पीएम मोदींच्या कार्यकाळात आपण विश्वचषक जिंकल्याचे ऐकायला मिळेल. आजकाल या देशात काहीही होऊ शकते.”असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली.