नवी दिल्ली : ‘दिल्ली’चे तख्त काबीज करण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सध्या जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. येत्या ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीकर ‘राजगादीचा’ मानकरी ठरवण्यासाठी कौल देणार असून राजकीय पक्षांकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचे चित्र पाहता प्रमुख लढत सत्ताधारी आम आदमी पक्ष व भारतीय जनता पक्ष यांच्याच दरम्यान होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये भाजप संपूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे दिसत असून काल (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर प्रचारसभेचे देखील आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षावर थेट निशाणा साधला. “दिल्लीकरांना असं सरकार आवश्यक आहे जे सुधारित नागरिकत्व कायदा, ३७० कलमाचे उच्चाटन अशा देशहिताच्या निर्णयांचा विरोध नव्हे तर स्वागत करेल” असं वक्तव्य करत पंतप्रधान मोदींनी आम आदमी पक्षाला लक्ष्य केलं.