पुणे(प्रतिनिधी) : राज्यातील जिल्हा, तालुक्यांमध्ये दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करण्यासाठी तसेच कृषी विभागाचे धोरण ठरवण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची दरमहा आकडेवारी नव्याने निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी 1961 ते 2010 दरम्यानच्या तब्बल 49 वर्षांच्या पर्जन्यमानाचा अभ्यास भारतीय हवामानशास्त्र विभागाने केला आहे. त्यांनी अभ्यासलेल्या तांत्रिक आणि सांख्यिकी आकडेवारीवरून राज्यातील जिल्हा, तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान निश्चित केले आहे.
पावसावर आधारित शेती हा बेभरवशाचा ठरत आहे. त्याचबरोबर पावसाने धरण, तलावांत पाणी साठवून ते पिण्यासाठी वापरले जाते. मात्र, पावसाच्या लहरीपणाचा दरवर्षी अभ्यास हा भारतीय हवामानशास्त्र विभाग करतो. या पावसाची आकडेवारी मोजण्यासाठी प्रत्येक मंडलच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात आली आहेत. मंडल अधिकाऱ्यांमार्फत पावसाळ्यात त्यातील आकडेवारी घेऊन ती महसूल विभागाकडे दिली जाते. त्यावरुन जिल्हा, तालुक्याची सरासरी आकडेवारी निश्चित केली जाते. ज्यावेळी दुष्काळ जाहीर करायचा असेल, त्यावेळी ही आकडेवारी गृहीत धरली जाते.
त्याचबरोबर पूर येतो त्यावेळीही संबंधित वर्षाच्या पूर्वीची सरासरी आकडेवारी गृहीत धरली जाते. ही आकडेवारी आता नव्याने तयार करण्यात आली आहे. त्यासाठी भारतीय हवामान विभागाने 1961 ते 2010 या दरम्यानच्या काळातील पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. त्यानुसार आता यापुढे जर दुष्काळ जाहीर करायचा असेल किंवा पूरस्थिती जाहीर करताना या आकडेवारीचा आधार घेतला जाणार आहे.