मुंबई: वंचित बहुजन आघाडी कडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांचीच ऑफर दिल्याने आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे”. असे एमआयएम कडून जाहीर करण्यात आलं होत. त्यानंतर आता यावर बोलताना “आम्ही आठ जागांची ऑफर दिलीच नाही” असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच जर एमअयएम आमच्यासोबत येणार असेल, तर त्यांचे स्वागतच आहे. असेही आंबेडकरांनी जाहीर केल आहे.
दरम्यान खासदार जलील यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचे असदुद्दीन ओवेसींनी जाहीर केल्यावर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम मध्ये काडीमोड झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु आता ओवेसी हे जागांबाबत तडजोड करून वंचित आघाडी सोबत जाण्यास तयार असल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. तसेच पुन्हा नव्याने सुरवात करण्याची आमची इच्छा असल्याचे जलील यांनी म्हटले आहे. त्यातच आता आंबेडकर यांनी देखील एमआयएम साठी आमची दारे खुली असल्याचे जाहीर केल्याने हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्रित लढविणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.