कोणाचीही लाचारी न पत्करता मी वृत्तपत्र चालविले ः “प्रभात’कार वा. रा. कोठारी
पुणे, दि. 14 – “पैशाची, मानाची अभिलाषा न धरता, कोणापुढेही लाचारी न पत्करता आणि स्वतःला योग्य वाटले ते विचार सडेतोडपणे मांडून मी वृत्त चालविले’, अशा आशयाचे उद्गार “प्रभात’कार वा. रा. कोठारी यांनी काढले. पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आज सायंकाळी “साधना’च्या आंतरभारती सभागृहात “माझे संपादकीय जीवनातील अनुभव’ या विषयावर कोठारी यांचे व्याख्यान झाले.
कोणापुढे कुर्निसात करणे माझ्या स्वभावात नाही
मला खपवून घेणे जमत नाही हीच माझ्या स्वभावाची अडचण आहे, असे सांगून कोठारी म्हणाले, वाकून सलाम करणे माझ्या स्वभावात नाही. यामुळे अनेकांचे गैरसमज झाले, पण त्याला इलाज नाही.
माणसांची योग्यता जन्मावरून ठरू नये
ब्राह्मणेतर चळवळीतील अनुभव सांगताना ते म्हणाले, माणसाची योग्यता जन्मावरून न ठरवता त्याच्या कर्तृत्वावरून ठरावी, असा मी प्रचार केला. यासाठी मी स्पष्टपणे विचार मांडले.
लोकमान्य टिळक यांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरही मी टीका केली व “केसरी’मध्येच ती छापून आली. लोकमान्यांनी मात्र ही टीका केली तरी माझ्यावर रोष धरला नाही, असे सांगून कोठारी म्हणाले की, लोकमान्यांच्या काळात गांधीयुगापेक्षा सहिष्णुता जास्त होती.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काय अनुभव आला?
स्वराज्य पक्षातील काही अनुभव सांगून कोठारी यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अनुभव सांगितले. ते म्हणाले, या चळवळीतदेखील त्यावेळी मला जे दोष दिसले त्यावर मी कडक टीका केली.
स्वतंत्र बाण्याचे दोनच पत्रकार
पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यदुनाथ थत्ते म्हणाले की, ज्यांनी पत्रकाराचा स्वतंत्र बाणा जपला अशा संपादकात कै. परुळेकर व वा. रा. कोठारी यांचा समावेश होतो.