पुणे – सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक पेठांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच ज्ञानप्रबोधिनी भागात कालपासून वीज पुरवठा बंद आहे. या घटनेची आणि संबंधित ठेकेदारांची चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
यासंदर्भात नारायण पेठेतील महावितरण केंद्रावर चौकशी केली असता महानगरपालिकेच्या रस्ता दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांकडून वेळोवेळी महावितरणच्या केबलचे नुकसान केले जाते. त्यामुळे पेठेतला वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेना पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांनी केली. यासाठी पुणे महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. योग्य कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने महावितरणवर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.