पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी होऊ पाहत आहे. परंतु महापालिका कार्यालय आणि आयुक्त बंगल्यापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कुदळवाडी येथे आल्यानंतर शहर स्मार्ट आहे की नाही याची प्रचिती सर्वांनाच येईल. कुदळवाडी येथे भूमिगत वीजवाहिनी करण्यासाठी महावितरणकडे बजेट नाही. त्यामुळे कुदळवाडीतील मोरे पाटील चौक ते जाधववाडीकडे जाणाऱ्या मार्गावर वारंवार वीजवाहिन्या तुटत आहेत. परंतु महावितरण यावर कोणतीही उपाययोजना न करता बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांना वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या अचानकच तुटून जमिनीवर पडण्याचे प्रकार चिखली, कुदळवाडी, पवार वस्ती, हरगुडे वस्ती आदी परिसरात सातत्याने घडत आहेत. बुधवारी (दि. 19) कुदळवाडी येथील आयुष मेडिकल आणि सागर हॉटेलच्या समोर असलेल्या महावितरणची वीजवाहिनीला क्षमतेपेक्षा अधिक उंचीचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक अडकल्याने वीजपुरवठा करणाऱ्या चारही विजेच्या तारा तुटल्या आहेत. त्यामुळे कुदळवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु या वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी महावितरणकडे बजेट नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.
चिखली, कुदळवाडी येथील मोरे पाटील चौक ते जाधववाडीकडे जाणाऱ्या मार्गावर महावितरणचे विद्युत खांब आहेत. या विद्युत वाहिनीला मोठ्या प्रमाणावर झोळ पडला असून येथे वारंवार तारा तुटण्याचे प्रकार घडत आहेत. आतापर्यंत एक वर्षाच्या आत साधारण पाच ते सहा वेळा वीजवाहिन्या तुटल्या आहेत. हा रस्त्यावर कायम वर्दळ असते. या मार्गावर दुर्गामाता मंदिर व चिखलीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर आहे. त्यामुळे सकाळ, सायंकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी असते. तसेच दुर्गा माता मंदिरासमोर कामगार नाका भरत आहे. त्यामुळे शेकडोने माणसे येथे उभा असतात. या मार्गावरून महावितरणचे विजेचे खांब गेले आहेत. या तारांना झोळ आला आहे. त्यामुळे अवजड वाहने अथवा भंगाराच्या गाड्या या मार्गावरून ये-जा करताना तारांना अडकून अपघात घडत आहे. क्षमतेपेक्षा जास्त उंचीची वाहतूक
कुदळवाडीत दिवसरात्र अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. परंतु बहुतांश अवजड वाहने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करतात. ती वाहने या वीजवाहिन्यांना अडकून अपघात घडत आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
कुदळवाडीतील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सध्या निधी नसल्याने हे काम रखडले आहे. तसेच या परिसरातून गॅसवाहिनी गेल्याने भूमिगत वीजवाहिनी टाकण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे महावितरणकडून निधी मंजूर झाल्यानंतर गॅसवाहिनी विभागाची परवानगी घेऊन येथील वाहिन्या भूमिगत करण्यात येतील. – रमेश सूळ, महावितरण अधिकारी.
दुर्घटनेनंतरच सुधारणा होणार का?
या परिसरात आतापर्यंत पाच ते सहा वेळा वीजवाहिन्या तुटल्या आहेत. विद्युतपुरवठा सुरू असताना तार जर एखाद्याच्या अंगावर अथवा वाहनावर पडली तर एखाद्याचा हकनाहक जीव जाऊ शकतो. आतापर्यंत सुदैवाने येथे जीवितहानी झालेली नाही. परंतु अशी दुर्घटना घडल्यानंतरच महावितरणला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
अतिउंचीची वाहने रोखण्यासाठी कमान उभारा
मोरे पाटील चौक येथे जाधववाडीकडे जाणाऱ्या मार्गावर महावितरणची विद्युत वाहिनीच्या उंचीपेक्षा एक फूट कमी उंचीची कमान उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जर अतिउंचीची वाहने अंतर्गत रस्त्यावर येण्यापूर्वीच अडविली तर वारंवार तुटणाऱ्या विद्युत तारा तुटणार नाहीत. त्यामुळे महावितरणने या मार्गावर लोखंडी कमान उभारावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.