श्रीनगर – गेले अनेक दिवस काश्मीरात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील लोकांचा बाह्य जगाशी असलेला संपर्क तुटला आहे. तथापी आता येत्या सोमवार पासून मोबाईलची पोस्टपेड सेवा सुरू केली जाण्याची शक्यता आहे. गेले 69 दिवस तेथील ही सेवा पुर्णपणे बंद आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील सुमारे 70 लाख नागरीकांची चांगलीच कोंडी झाली आहे.
ही सेवा पुन्हा कशा पद्धतीने सुरू करायची यावर विविध पर्यायांवर विचार केला जात आहे. केवळ बीएसएनएलचे मोबाईल सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याचेही सांगितले गेले. पण आता मात्र प्रशासनाने सर्वच कंपन्यांचे पोस्ट पेड मोबाईल सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.
काश्मीर खोऱ्यात सुमारे चाळीस लाख मोबाईल धारक आहेत. त्यातील 26 लाख प्रिपेड कार्ड धारक आहेत. सध्या फक्त पोस्ट पेड मोबाईलच सुरू करण्याचा प्रशासनाचा इरादा असल्याने या प्रिपेड कार्डधारक 26 लाख लोकांना आणखी वाट पहावी लागू शकते.