बनावट पत्रांमुळे उमेदवार हैराण : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
स्टाफ सिलेक्शन कमिशनने निकाल जाहीर न केल्याचे स्पष्टीकरण
पत्र मिळताच उमेदवारांची रूजू होण्यासाठी धाव
पुणे – टपाल खात्याच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगत अनेक उमेदवारांना नियुक्तीपत्र पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या पत्रांआधारे टपाल खात्याकडे रुजू होण्यासाठी गेलेल्या उमेदवारांना ही पत्रं बनावट असल्याचे समजले आहे. हा गोंधळ टाळण्यासाठी अखेर टपाल खात्याने संकेतस्थळावर “हा निकाल जाहीर केला जाईल’, असे सांगत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
टपाल खात्यामध्ये पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट ही पदे भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने देशभरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. मात्र, हा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, तरीदेखील काही परीक्षार्थींना त्यांची नियुक्ती लिपिक पदावर झाल्याचे नियुक्तीपत्र मिळत आहे.
दरम्यान, आपली नियुक्ती झाल्याची बाब या पत्राद्वारे समाजल्यानंतर रुजू होण्यासाठी गेलेल्या उमेदवारांना अशी कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अशाप्रकारची बनावट नियुक्तीपत्र पाठवल्याची बाब टपाल खात्याच्या निदर्शनास आली. आहे. आता टपाल खात्याने अशा बनावट नियुक्तीपत्राचा हवाला देत, या परीक्षेचा निकाल स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावर अधिकृतरित्या जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी टपाल खात्याच्या संकेतस्थळावरदेखील जाहीर केली जाणार असल्याचे पत्रक काढावे लागले आहे. संचालक सत्यानारायण दाश यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
राजमुद्रेचाही गैरवापर
हे नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर सात ते दहा दिवसांत टपाल खात्याच्या सर्कलने त्यांना रुजू करुन घेण्याची कार्यवाही करण्याचे या पत्रात म्हटले आहे. सहायक संचालक प्रदीप्ता कुमारबिसोई यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र पाठवले आहे. त्यावर भारताची राजमुद्रादेखील वापरण्यात आली आहे.