पिंपरी – समुद्रासारखी अफाट जनसंख्या वाढली आहे; पण माणूस अन् माणुसकी हरवत चालली आहे, असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ साहित्यिक उद्धव कानडे लिखित “माणूसपणाची सनद’ या व्यक्तिचित्रणात्मक ललितसंग्रहाचे आणि प्राचार्य डॉ. संभाजी मलघे लिखित “बंधुतेचं झाड’ या समीक्षा ग्रंथाचे लोकार्पण अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योजक सुदाम भोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कवी भरत दौंडकर, दत्तात्रय जगताप, प्रदीप गांधलीकर, महेंद्र भारती, उद्धव कानडे आणि प्राचार्य डॉ. संभाजी मलघे उपस्थित होते.
अण्णा हजारे म्हणाले की, रंग, रूप, भाषा, वेष वेगवेगळे असले तरी हे जग आपल्याला सुंदर भासते. पण या जगातून खरा माणूस हरवत असल्याने हे चित्र मलिन झाले आहे. अश्लीलता, बीभत्सता यामुळे आपल्या उज्ज्वल परंपरा आणि आई-वडिलांचे संस्कार दुर्लक्षित झाल्यानेच माणुसकीचा ऱ्हास होतो आहे. धर्म, जात यांच्या प्राबल्यामध्ये माणूस खूप महत्त्वाचा आहे. भरत दौंडकर यांनी राजकीय उपहासिका सादर केली. उद्धव कानडे यांनी कवितांचे सादरीकरण केले. सुदाम भोरे यांनी मनोगत व्यक्त केले. महेंद्र भारती यांनी आभार मानले.