श्रीगोंदा (प्रतिनिधी) – नगर-दौंड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, लोणी व्यंकनाथ ते पारगाव फाटा या टप्प्यातील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून या ठिकाणी रस्त्याला मोठं- मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे येथून प्रवास करताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.
जवळपास सहाशे कोटी खर्चून नगर-दौंड-फलटण रस्त्याचे काम सुरू आहे. नगर ते दौंड रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. परंतु, लोणी व्यंकनाथ ते पारगाव फाटा या टप्प्यातील रस्त्याचे काम झालेले नाही. या टप्प्यातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना खड्ड्यातून मार्ग काढत पुढे जावे लागत आहे. त्यातच पाऊस झाल्यानंतर खड्डयांमध्ये पाणी साचत आहे. लोणी व्यंकनाथ ते पारगाव फाटा या टप्प्यातील रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खड्डयांमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांना खड्डयांचा अंदाज येत नाही, परिणामी छोट्या वाहनांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर दुचाकीस्वारांना या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
नगर-दौंड रस्त्याचे कॉंक्रीटीकरण झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. परंतु, लोणी व्यंकनाथ ते पारगाव फाटा या टप्प्यात अचानक खराब रस्ता सुरू होत असल्याने नवीन प्रवाशांना अंदाज येत नसून रात्रीचे वाहनांचे अपघात होत आहेत. जवळपास वर्षभरापासून हा रस्ता खराब असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या टप्प्यातील रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.