नवी दिल्ली – उत्तर भारतात सध्या वायु प्रदुषणाची जी पातळी आहे ती पातळी कायम राहिली तर तेथे राहणाऱ्या सुमारे 51 कोटी लोकांचे सध्याचे आयुष्यमान 7 वर्षे 6 महिन्यांनी घटणार आहे असे एका अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट च्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्सने म्हटले आहे की 2013 पासून जगभरातील वायु प्रदूषणात जी वाढ झाली आहे त्यातील सुमारे 44 टक्के वाढ एकट्या भारतातून झाली आहे. 1998 पासून, भारतातील सरासरी वार्षिक कण प्रदूषण (पार्टीक्युलेट पोल्युशन) 61.4 टक्क्यांनी वाढले आहे.
एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स च्या नवीन विश्लेषणानुसार, वायू प्रदूषणामुळे भारतीय लोकांचे सरासरी आयुर्मान पाच वर्षांनी कमी होत आहे आणि उत्तर भारतातील गंगा नदीच्या मैदानी भागातील सुमारे 51 कोटी लोकांचे आयुष्य प्रदुषणाची पातळी वाढल्याने 7 वर्ष 6 महिन्यांनी कमी होत आहे.
बांगलादेशानंतर भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. आणि दिल्ली हे जगातील सर्वात प्रदुषित शहर आहे. तेथेही प्रदुषणामुळे लोकांचे आयुष्यमान कमी होत असून दिल्लीतील प्रदुषणाची पातळी अशीच कायम राहिल्यास दिल्लीतील लोकांचे आयुष्यही दहा वर्षांनी कमी होऊ शकते असे अनुमानही या अभ्यासातून काढण्यात आले आहे.
अहवालाच्या विश्लेषणात असे म्हटले आहे की जर वार्षिक सरासरी प्रदूषण पातळी प्रति घन मीटर पाच मायक्रोग्रामपेक्षा जास्त नसेल तर दिल्लीचे आयुर्मान सरासरी 10 वर्षांनी वाढू शकते पण इतके वायुप्रदुषण नियंत्रण करणे दिल्लीच्या प्रशासनाला कितपत शक्य होईल हाच मुख्य प्रश्न आहे. या अहवालात म्हटले आहे की भारतातील सर्व 1.3 अब्ज लोक अशा भागात राहतात जेथे वार्षिक सरासरी कण प्रदूषण पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहे.