कामशेत (वार्ताहर) – तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून कामशेत प्रसिद्ध आहे. शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शहरात खरेदी व तत्सम कारणांसाठी मोठी वर्दळ असते. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. मात्र, ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलीस दिसत नसल्याची तक्रार होत असून कोंडीपेक्षा महामार्गच पोलिसांचे ‘लक्ष्य’ असल्याचे बोलले जात आहे.
कामशेत शहरात वाढलेली अतिक्रमणे, मुख्य रस्त्याच्या कडेला व मधोमध बेशिस्तपणे पार्किंग केलेली वाहने, व्यापारी वर्गाच्या मालाची अवजड वाहने, बेशिस्त वाहन चालक, रोडरोमिओ यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. तसेच अनधिकृत थाटलेल दुकाने आदींवर पोलिसांचे नियंत्रण दिसत नाही. परिणामी महामार्गावर पोलिसांचे जास्त लक्ष्य असून पुणे-मुंबई मार्गावर कमाई होत असल्यचा वाहन चालकांचा आरोप आहे.
बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणांकडे दुर्लक्ष कामशेत ही मावळ तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असून नाणे, आंदर व पवन मावळ व आजूबाजूची सुमारे सत्तर गावांचे हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. रोज हजारोंच्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी शहरात दाखल होत असतात. येथे शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अनेक खासगी दवाखाने, मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आदी महत्त्वाची ठिकाणे असल्याने विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शेतकरी व व्यावसायिकांची शहरात मोठी वर्दळ असते.
महामार्ग व लोहमार्ग शहरात असल्याने कामशेतमध्ये यावे लागते. कामशेत शहरात पार्किंगची ठोस उपाययोजना नाही. अनेक लोक रस्त्याच्या कडेलाच बेशिस्तपणे वाहने उभी करतात. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक आणि वाहनचालकांचा आहे.
पर्यटकांमध्ये वादावादी
पुणे मुबंई हद्दीतील महामार्ग महत्त्वाचा असून येथे वाहतूक पोलीस होमगार्ड व वॉर्डन यांच्याकडून मोठी लूट होत आहे. नानाविध कारणे सांगून पर्यटकांना पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. यातून वाहनचालक आणि पर्यटक यांच्यात वादवादीचे खटके उडताना दिसतात. पर्यटनाला जाताना आणि परतीच्या या प्रवासात देखील पर्यटकांना असेच अनुभव येत असल्याच्या पर्यटकांच्या तक्रारी आहेत.
पोलिसच गायब
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यापेक्षा महामार्गावर नित्यनियमाने सकाळी व सायंकाळी महामार्गावर ठरावीक ठिकाणी वाहतूक पोलीस, होमगार्ड व वार्डन यांचा राबता असतो, त्यामुळे शनिवार व रविवारी शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलीस दाखवा आणि बक्षीस मिळावा, असे कामशेतकर नागरिक म्हणत आहे.