नेवासे, – नगर-औरंगाबाद रस्त्यावरील कांगोणी शिवारात वाहन आडवे लावून प्रवाशांना लुटणार्या टोळीतील दोघांना शनिशिंगणापूर पोलिसांनी पाठलाग करत अटक केली. या टोळीतील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि.2) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर कांगोणी शिवारात चांदा येथील रवींद्र राजेंद्र कदम यांना दोघांनी अडवून मारहाण केली तसेच त्यांच्याकडील दोन तोळ्यांची सोन्याची चेन व 13 हजार 500 रुपये रोख व 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल, चोरीन नेला. त्यानंतर कदम यांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पोहणी केली. तसेच आरोपींचा शोध सुरू केला.
याच दरम्यान, काही संशयित व्यक्ती शनिशिंगणापूर फाटा येथे फिरत असल्याची माहिती खबरीतर्फे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने आपला मोर्चा शनिशिंगणापूर फाट्याकडे वळविला. पोलीस शनिशिंगणापूर फाट्यावर गेले असता, हे संशयित व्यक्ती कांगोणी फाट्यापासून जवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात लपल्याचे समजले. त्यानंतर पोलीस या शेताजवळ गेले असता, त्याची चाहूल लागताच संशयित तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. तसेच नितीन मोहन राशीनकर व वैभव बाबासाहेब घोडके (दोघे रा. कारोगाव, ता. नेवासे) या दोघांना जेरबंद केले. त्यातील एक जण अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे चोरीची चौकशी केली असता, प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरी केलेला मोबाईल काढून दिला. त्यांच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली. त्यांच्यावर कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
नितीन राशीनकर हा सराईत गुन्हेगार असून, जबरी चोरीसह त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल, गडाख, पोलीस कर्मचारी माळवे, देवकर, शिंदे, शेख, राठोड, वाघे, गोरे यांच्या पथकाने केली.