नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशात आता आधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेल्या अमृत भारत रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या अमृत भारत ट्रेनला लवकरच हिरवा झेंडा दाखवतील. या नवीन तंत्रज्ञानाने ट्रेनचा वेग तसेच प्रवाशांच्या आरामात लक्षणीय वाढ होणार आहे.
“पुश-पुल टेक्नॉलॉजीमुळे अमृत भारत ट्रेनचा वेग अधिक चांगला राहील. या तंत्राने गाडी लवकर वेग घेते आणि त्वरीत थांबते, त्यामुळे वाटेत जेथे वळण आणि पूल असतील तेथे वेळेची बचत होईल. यात अर्ध-स्थायी कप्लर आहेत जे प्रवाशांना जाणवणाऱ्या धक्क्यांची व्याप्ती दूर करतात. प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. रुंद दरवाजे आणि विशेष रॅम्पसह दिव्यांगांसाठी खास शौचालयेही बनवण्यात आली आहेत,असे वैष्णव म्हणाले.
तसेच या गाडीच्या इंजिनांमध्ये संपूर्ण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वंदे भारताप्रमाणेच अमृत भारत ट्रेनमध्येही एक परिपूर्ण लोकोमोटिव्ह कॅब बसवण्यात आली आहे,” असे त्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नव्याने बांधलेल्या ‘अमृत भारत’ ट्रेनची पाहणी केल्यानंतर सांगितले. वंदे भारत ट्रेन आणि आगामी अमृत भारत ट्रेनमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान मेड इन इंडिया असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.