नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, या योजनेच्या पुढच्या टप्प्याचे पैसे जमा करण्यात आले.
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाअंतर्गत, 9.75 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, 19,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी थेट जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हा नववा हप्ता होता.
स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजेच 2047 सालचा भारत कसा असेल, त्याची परिस्थिती कशी असेल हे निश्चित करण्यात आपले कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. करोनोच्या साथीच्या काळात, शेतकऱ्यांनी घेतलेल्या विक्रमी पिकांबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले.
केंद्र सरकारने खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांकडून धान म्हणजेच तांदळाच्या खरेदीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 1,70,000 कोटी रुपये आणि गव्हाच्या खरेदीपोटी 85,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
काही वर्षांपूर्वी, ज्यावेळी देशात डाळींचा मोठा तुटवडा होता, त्यावेळी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना डाळींचे उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले होते. परिणामी गेल्या सहा वर्षात डाळींच्या उत्पादनात जवळपास 50 टक्क्यांची वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत भारताला खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-पाम तेलाच्या माध्यमातून स्वयंपाकाच्या तेलाच्या संपूर्ण व्यवस्थेत 11000 कोटी रुपये गुंतवले जातील असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना सर्व सुविधा, उत्तम दर्जाची बियाणे आणि तंत्रज्ञान मिळेल, याची सरकार पूर्ण काळजी घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारत पाहिल्यांदाच कृषी निर्यात क्षेत्रात जगातील पहिल्या दहा देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे, हे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 60 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यापैकी एक लाख कोटी रुपये छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात करोना काळात जमा करण्यात आले.
करोंनाकाळात 2 कोटींपेक्षा अधिक किसान सन्मान कार्ड जारी करण्यात आले. शेतकऱ्यांना येत्या काळात देशातील कृषि पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधांचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय, फूड पार्क, किसान रेल, आणि पायाभूत निधी चाही छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल असे मोदी म्हणाले.