जायपत्री / जायफळ – जायफळ हे सुगंधी फळ असून औषधात, आहारात विविध पदार्थात, मिठाईत व लहान मुलांच्या बालगुटीतही वापरतात. जायफळाचे मोठे वृक्ष असतात. याची फळे लहान पेरूप्रमाणे असून त्यात असणाऱ्या बियांना जायफळ म्हणतात. फळ पिकल्यावर आपोआप फुटते व त्यातून जायफळ निघते व त्या बीवर असलेल्या सालीलाच जायपत्री असे म्हणतात. जायफळात उडनसील तेल 28 टक्के आहे व जायपत्रीमध्ये 8.17 टक्के आहे. जायफळ हे स्निग्ध, तीक्ष्ण असून चवीला कडवट, तुरट असून उष्ण आहे. उष्ण व तीक्ष्ण असल्यामुळे अग्निवर्धक म्हणजे भूक वाढविणारे असून कफ व वात विकारात उपयुक्त आहे.
- जायफळ हे सूज नाहीशी करणारे व वेदनाशामक, उत्तेजक असून त्वचाविकार व दुर्गंधीनाशक आहे.
- डोकेदुखी व सांधेदुखी यामध्ये याचा लेप सांध्यावर वा डोक्यावर लावतात.
- त्वचाविकारात याचे मलम तयार करून ते वेदनाशामक व दुर्गंधीनाशक म्हणून वापरतात. दुर्गंधीयुक्त व्रणावर याचे चूर्ण वापरतात. लहान मुलांत सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीत जायफळ उगाळून डोक्यावर लावतात.
- जायफळ व सुंठ उगाळून लावल्यामुळे डोकेदुखी थांबते. जुलाब होत असल्यास जायफळ उगाळून चाटवितात किंवा बेंबीमध्ये लेप करतात.
- जास्त मात्रेत दिल्यास ते मादक परिणाम करते. निद्रानाश असल्यास जायफळ वापरतात.
- जायफळामुळे मुखदुर्गंधी कमी होते व तोंडाला चव येते. यकृताचे कार्य सुधारते. ग्राही म्हणजे मलाला घट्टपणा आणणारे असून कृमिक आहे.
- संडासला (मल पदार्थाला) येणारी दुर्गंधी यामुळे कमी होते. मलपदार्थाचा काळेपणा यामुळे कमी होतो.
- उलट्या व जुलाब यामध्ये जायफळ उगाळून चाटवितात.
- कफनाशक असल्याने सर्दी, खोकला, दमा या विकारात उपयुक्त आहे.
- पुरुषांमध्ये कामोत्तेजना वाढविण्यासाठी व शुक्रस्तंभनासाठी याचा उपयोग चांगला होतो. लैंगिक दुर्बलता असल्यास
- लिंगाला जायफळाच्या तेलाचा अभ्यंग करतात व त्यावर नागवेलीचे पान बांधतात.
- स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या पोटदुखीत जायफळाचा उपयोग होतो.
जायफळ व जायपत्री यांचे गुणधर्म बरेचसे सारखे असले, तरी जायपत्री ही अधिक रोचन (रुचि उत्पन्न करणारी), वर्ण्य (रंग उजळविणारी) व वेदनाशामक आहे. त्या मानाने जायपत्री ही जायफळापेक्षा कमी ग्राही म्हणजे संडासला कमी घट्टपणा आणणारी आहे.
पपई – पपईचे नित्य सेवन हे अकारण होणारी उत्तेजना कमी करते. अस्वस्थपणा, घबराहट, हृदय धडधडणे इत्यादी विकारही दूर होतात. पपईमुळे मुखदुर्गंधीही जाते. म्हणूनच प्रत्येकाने रोज एक पपईची फोड तोंडात धरून तिचे चांगले चर्वण करावे आणि मग ती खावी. असे केल्याने आपले अन्नपदार्थ आठ तासांऐवजी सहा तासात पचतात. म्हणजेच ज्यांना शरीर कमवायाचे आहे त्यांनी नियमित पपई खावी. पपईचा आहारात समावेश म्हणजे सुदृढ प्रकृती मिळविणे. कारण पपई नुसती पाचकच नाही तर शक्तिदायी आहे.
विषनाशक : आपण जे खातो ते काही वेळा विजातीय असते. जे शरीरात विष उत्पन्न करते. असे शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी पपई उपयुक्त आहे. पपईचा मुरंबा नियमित रोज जेवणात घ्यावा. त्यामुळे पोटाच्या लहान व मोठ्या आतड्याच्या तक्रारी दूर होतात. पपईत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याची क्षमता आहे. पपई ही मूत्रलविकांरावर उपयुक्त आहे. जी गुदद्वाराची सफाई करते. थोडक्यात संपूर्ण शरीराला अमृतरस प्रदान करणारी पपई लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बल देते. शिवाय हे फळ स्वस्त असल्यामुळे सर्वजण खाऊ शकतात.
तेजस्वी कांतीसाठी : आपल्या तोंडाचे तसेच चेहऱ्याचे तेजस्वीपण पपईमुळे खुलते. ज्यावेळी शरीरात सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स जात नाहीत आणि त्वचा ओघळते तेव्हा पपईचा गर चेहऱ्याला लावावा. जो चेहरा तेजस्वी करतो. म्हणूनच चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी पपई रोज नियमित खावी. शरीरातील खनिज क्षार तसेच लवणाची कमतरता पपई दूर करते. जे लोक पपईच्या रसाने चेहरा धुतात किंवा गुळण्या करतात त्यांचे घशाचे विकारही दूर होतात. पपईच्या रसाने चेहरा धुतल्यामुळे चेहरा कांतिमान होतो. पपई शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवते. त्यामुळे लघवीद्वारे शरीरास नको ते पदार्थ बाहेर पडतात. लघवी तुंबणे तसेच थेंब थेंब लघवी होणे अशा विकारात पपई उपयुक्त आहे. म्हणूनच पपई आरोग्याच्या दृष्टीने एक चमत्कारच आहे
सर्व ऋतूत शरीराला उपयुक्त फळ : तसं पाहिलं तर उन्हाळ्यात पपई अधिक येते. पण आजकाल दक्षिणेकडची पपई सर्व ऋतूत येते. शरीराची एखादी शीर आखडली गेली तर पपई खावी. थोड्याशा कामाने जर खूप कंटाळा येत असेल, शरीर दमत असेल, कामात मन लागत नसेल, तरी देखील पपई खावी. ताजी पपई नेहमीच मिळेल असं नाही. म्हणून पपई घातलेले लाडू, मुरंबा, वड्या खाण्याची पद्धत दक्षिणेकडे आहे. कच्च्या पपईची भाजी शरीराला खूप उपयुक्त आहे. मौसमी विकार म्हणजे सर्दी, खोकला कायमचा जाण्यासाठी पपईचे लोणचे रोज खावे. मेंदूतील प्रक्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी पपई हे एक ब्रेन वॉश टॉनिकच म्हणावे लागेल.
– सुजाता गानू