पेठ (पुणे) – सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात गेले दोन-तीन दिवस परतीचा मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलसरपणा वाढला आहे. या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी बटाटे काढायला सुरुवात केली आहे; पण पावसाच्या पाण्यामुळे ट्रॅक्टरने अथवा बैल जोडीने बटाटे काढणे शक्य होत नाही. अनेक शेतकरी मिळेल तसे मजुरांची व्यवस्था करून छोट्या लाकडांनी बटाटे उपसून काढत आहे; पण जमिनीतील ओलसरपणामुळे बटाटे सडण्याचे प्रमाण वाढले आहे.
सातगाव पठार भागांमध्ये बटाटा काढणीसाठी अनेक ठिकाणांहून परिसरातील मजूर येतात. मात्र, या वर्षी करोनाच्या संसर्गामुळे मजुरांची टंचाई भासत आहे. येथे साडेसहा हजार एकर शेती क्षेत्रात बटाटा लागवड झाली आहे. काढणीला आलेला बटाटे वेळेत काढला नाही तर सडून जाण्याचा धोका असल्याने येथे बटाटा काढणी सुरू झाली आहे. बटाटा काढणीवेळी करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शोसल डिस्टन्सचा वापर करून बटाटा काढणी सुरू झाली आहे.
- दिवसाला 300 ते 500 रुपये मजुरी
घरातील उपलब्ध माणसे, मजूर आणून ट्रॅक्टरच्या साहाय्याने बटाटा काढणी चालू आहे. पुरुष मजुरास 250 किंवा 300 रुपये व महिला मजुरास 200 किंवा 250 रुपये व जोडीला 500 किंवा 600 ते 700 रुपयांपर्यंत दिवसाला
मजुरी द्यावी लागते. एकावेळी मोठ्या शेतकऱ्यांकडे 25 ते 30 मजूर बटाटे काढणीस लागत आहेत. 100 किलो बटाट्याच्या बियाणे लागवड केली असेल तर प्रति शंभर किलोस 10 ते 12 पिशव्या, प्रति 55 ते 60 किलो गळीत निघत आहे. या भागातील शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक व्यवहार बटाटा उत्पादन व उत्पन्न यावर चालतात.
- प्रति 10 किलोस 20 ते 25 रुपये बाजारभाव
सातगाव पठार भागात प्रत्येक शेतकऱ्याने 1 ते 10 एकर शेतीक्षेत्रात बटाटा लागवड केली आहे. एक एकर बटाटा शेतीला खते, औषधे, मजुरी, फवारणी, बियाणे, काढणी असे मिळून 60 ते 65 हजार खर्च येतो. सध्या प्रति 10 किलोस 20 ते 25 रुपये किरकोळ बाजारभाव आहे. मुंबई, पुणे येथील मार्केट व खासगी कंपन्यांकडून 225 दरम्यान प्रति 10 किलोस भाजरभाव दिला जातो. मात्र यावर्षी बटाटा पिकाचे गळीत कमी असल्यामुळे हा बाजारभावसुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही.