वडगाव मावळ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणामधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या धरणात ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालखी सोहळ्यापर्यंत जाधववाडी धरणातील पाणीसाठा पुरविण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
कडक उन्हानामुळे राज्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. मावळ तालुक्यातील धरणामधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. या पाण्याचे जूनमधील संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.
जाधववाडी धरणातून नवलाख उंब्रे परिसर, जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी अशा देहूपर्यंतच्या ग्रामपंचायतींना पिण्यासाठी व शेतीला पाणीपुरवठा केला जातो. गावांच्या मागणीनुसार, साधारणपणे दर महिन्यात सुमारे दहा दिवस धरणातून पाणी सोडले जाते.
धरणातील उपयुक्त पाणीसाठा ०.३६ टीएमसी इतका असून सध्या धरणात ४४ टक्के (०.१५ टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी धरणात ४७ टक्के (०.१६ टीएमसी) पाणीसाठा होता.
कडक उन्हाळा व पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात कमी पाणीसाठा आहे. मात्र, जून महिन्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा राहील, अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. – किशोर चव्हाण, शाखाधिकारी, जाधववाडी धरण