अखेर प्रतीक्षा मिटली : दिवसभर बरसल्या श्रावणसरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुका व जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, पावसाने शुक्रवारी दिवसभर शहर व परिसरात हजेरी लावली. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने पावसाची वाट पाहली जात होती. रोज ढग येत होते परंतु पाऊस पडत नव्हता. अखेर शुक्रवारी सकाळपासून श्रावणसरींनी जोर धरला आणि पावसाळ्याला सुरुवात झाल्याचे चित्र जुलै महिन्याच्या अखेरीस दिसू लागले.
यंदा देशात समाधानकारक मॉन्सून बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील ओढे दुथडी भरुन वाहू लागले. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याचा अंदाज धरत, शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने सर्वांचाच अंदाज चुकवत दडी मारल्याने तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, गुरुवारी (दि.23) रात्री संततधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीदेखील सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने उकाडा कमी होऊन गारवा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
मावळातदेखील पावसाने हजेरी लावली असून, रखडलेल्या भातपिकांच्या लावणीला पूरक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. मात्र, भात लागवडीकरिता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. स्कायमेट वेदरने 2 ऑगस्टपर्यंतच्या वर्तविलेल्या हवमानाविषयीच्या अंदाजात बहुतांशी दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे. तर 24, 25 आणि 26 जुलैला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय 27 आणि 28 जुलैला आकाश निरभ्र राहणार आहे. या कालावधीत तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस राहणार आहे.