लठ्ठपणा हा एक रोग आहे. अनावश्यक चरबी वाढल्यामुळे तो होतो. यावर अनेक वनौषधी उपयुक्त आहेत त्या म्हणजे आवळा, गुळवेल, गुडमार, विजयसार, जांभूळ बी, नागरमोथा, वावडींग, अनीसतेल ह्या मिश्रणाचे चूर्ण घ्यायला अर्ध्या चमच्यापासून सुरूवात करावी. रात्री एका ग्लासात ही पावडर घेवून त्यावर उकळून गार केलेले पाणी ओतावे व मिश्रण चमच्याने हलवून रात्रभर झाकून ठेवावे.
सकाळी नाश्त्यानंतर परत चमच्याने हलवून पिवून टाकावे. चुर्ण पावडरीची मात्रा हळूहळू वाढवावी. एका महिन्यात 2 चमच्यांपर्यंत न्यावी. वजन कमी होण्याचे प्रमाण साधारण 3 महिने नियमित वापरानंतर लक्षात येते. मात्र अंगातील सुस्ती, जडपणा व फोकशेपणा पहिल्या 2-3 आठवड्यातच कमी झाल्याचे आढळते. जर ह्याचा काही त्रास नसेल तर 6 महिन्यापर्यंतही हे वापरता येते. कुठलीही तक्रार उदभवल्यास सेवन तात्काळ थांबवावे.
ह्यातील काही वनौषधी उष्ण आहेत. विशेषत: उन्हाळ्यात किंवा उष्णतेचा त्रास होत असल्यास डोस कमी करावा. आहारात पाण्याचे प्रमाण वाढवावे व जेवताना रोज साजूक तूप घ्यावे. साजूक तूपाच्या माफक सेवनाने वजन वाढत नाही. मात्र हे तूप लोणकढेच हवे. बाजारात डब्यातून मिळणारे घी दूधावरची चरबी काढून बनवलेले असते ते उष्णाताशमन किंवा पित्तशमन करण्यास पर्याप्त नसते. साय काढून ती विरजण लावून मुरवून, लोणी काढून तूप कढविल्यास त्यात पित्तशमनाची कार्यक्षमता येते. दर जेवणात 1 ते2 चमचे अशा लोणकढ्या तूपाने शरीरात पित्तप्रकोप होत नाही, त्वचेची रूक्षताही कमी होते.
शरीरातील वजनवृद्धीची कारणे
आपण मैदा, साखर, कोल्ड्रींक व पिष्टमय पदार्थांवे सेवन अधिक करतो. त्यातून घाईघाईने खाणे, दाताचे आरोग्य नीट नसणे, लाळ कमी सुटणे व त्यामुळे जेवताना सारखे पाणी पिणे ह्यामुळे हे पिष्टमय पदार्थ तोंडात लाळेचे पचन न होता जठरात पोहोचतात. जठरात ह्यांचे पचन झाल्यास त्याचे चरबीत रूपांतर होते. ह्या उलट तोंडात पचन झाल्यास त्याचे शर्करेत रूपांतर होऊन दैनंदिन कार्यासाठी ती रक्तात जावून रोजच्या रोज वापरली जाते. म्हणूनच अतिशय सावकाश जेवल्यास काहीही न करता आपोआप वजन कमी होताना दिसते. थोड्याशा अन्नानेच भूक भागते, तृप्ती वाटते. पोट जड होणे, ढेकर, ऍसिडीटी, डोके दुखणे हे विकार बंद होतात.
लठ्ठपणा जाण्यासाठी जेवणाची पथ्ये :
प्रत्येकाने जेवताना काही पथ्ये अवश्य पाळावीत. जेवताना अजिबात बोलायचे नाही. टीव्ही पाहायचा नाही . जेवणाकडे लक्ष द्यायचे. एक घास बत्तीस वेळा चावायचा. जेवताना एकही घोट पाणी प्यायचे नाही. जेवणानंतर एक दोन ग्लास पाणी प्यावे. जेवणाच्या वेळा बदलू नये. दिवसातून फक्त 2 वेळा जेवण करावे. घरी असतील तर सकाळी नाश्ता न करता अकरा वाजता जेवण करावे व नाश्ता केल्यास दुपारी 1 ते 2 मध्ये जेवण करावे.जेवणाला कमीत कमी अर्धा तास तरी लागायला हवा.
पांचही इंद्रिये जेवणावर केंद्रीत करावीत. सकाळच्या जेवणानंतर दिवसभर शक्यतो गरम पाणी, एखादा चहा व संध्याकाळचे जेवण 7 च्या आत घ्यावे. रात्रीची झोप आणि जेवण ह्यात तीन तासाचे अंतर असावे. 1 महिन्यात वजन कमी झाल्याचे जाणवेल. दुपारी झोपण्याचे कटाक्षाने टाळावे. संध्याकाळी जेवणानंतर फिरावयास जावे म्हणजे छान झोपही लागते.
आपण खाताना घेणाऱ्या कॅलरीज व वापरात येणाऱ्या कॅलरीज ह्यामध्ये विसंवाद झाला की सेव्हींगच्या रूपाने ह्या कॅलरीजचे फॅट मध्ये रूपांतर होवून शरीरावर चरबीचे थर साठू लागतात. गरजेपुरते खावे आणि योग्य व्यायाम करावा.
अनुवंशिकतेतून लठ्ठपणा आला असेल तर सुरूवातीपासूनच काळजी घ्यायला हवी. विशेषत: चाळीशीनंतर शरीर वाताकडे झुकू लागते व वजन कमी करण्यास लोकॅलरी फूड म्हणून कच्च्या भाज्या सपाटून खाल्ल्या जातात. मूळची वात प्रकृति व त्यातूनही पचन व यकृत कमजोर असेल तर झपाट्याने शरीराचा साईज वाढत जातो. कितीही डाएटिंग वा व्यायाम वा औषधांना न जुमानता अशावेळी यकृताचे कार्य प्रथम सुधारणे आवश्यक असते. हे आपण यकृत बलवर्धक वनौषधी चुर्ण सांगताना पाहिले आहेच.
वजन कमी करण्यासाठी आहार आणि नियम :
स्वत:च्या वजनदार शरीराचा तिरस्कार करू नका. त्याच्यावर प्रेम करा.. शरीराच्या नैसर्गिक आज्ञांचे पालन करावे. मन व शरीराशी सुसंवाद साधावा. तसे न घडल्यास अनेक रोगांना आमंत्रण दिले जाते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे केस, त्वचा, यकृत, किडनी, सांधे ह्यांचे विकार आपोआप नाहीसे होतात.
फक्त त्यासाठी दोन वेळा नीट जेवण, नीट चावून खाणे ह्या बरोबरच मांसाहार, अंडी मासे, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बटाटे, तळकट पदार्थ, आईस्क्रिम, चॉकलेट, कोल्ड्रींक, दारू ह्यांचा सक्तीने त्याग करावा. वात प्रकृति असल्यास कच्च्या भाज्यांचाही मज्जाव करावा कारण वात प्रकृतीच्या लोकांना कच्च्या भाज्या त्या स्वरूपात पचत नाहीत. अशावेळी त्यांनी मोडाची कडधान्येही कच्ची न खाता शिजवून खाण्यास हरकत नाही.
रोजचे पोळी, भात, भाकरी, वरण, कढी, खिचडी, भाज्या, सूप हे खावे. दोन वेळच्या साध्या शुद्ध सात्विक जेवणाने कुठलाच आजार होत नाही. नको ते चवीचे, तामसी व अधेमधे खाण्यानेच आरोग्याच्या तक्रारी उदभवतात. स्थूलता वाढते. मसालेदार पदार्थ देखिल अल्सरसारख्या आजारांना निमंत्रण देतात.
आपल्या शरीरातील ग्लुकोजचे फॅटमध्ये रूपांतर होण्याची जी यंत्रणा वा मेटॅबोलिझम असतो त्यावर ह्या वनौषधी कार्य करतात. शरीरात चरबी साठू न देणे व त्याचबरोबर रक्तातील साखर कमी करणे गूडमार, विजयसार ,जांभूळ चूर्ण यामुळे फॅटचे परत साखरेत रूपांतर होण्यास चालना मिळते.
बऱ्याच जणांना ह्याचा फायदा होतो असे आढळते तरी काही जणांच्या बाबतीत वजन आहे तेवढेच राखून ठेवणे हा फायदा मिळतो. तसेच चरबी कमी होते. साधारण पहिले 3-4 महिने हे चूर्ण घ्यावे.कुठलाही त्रास होत नसेल वजन कमी होत असेल तर दीर्घकाळही ह्या वनौषधी घ्याव्यात. ह्या वनौषधींचे दुष्परिणाम फारसे दिसून आलेले नाहीत. औषधाइतकाच आहार व सवयी ह्यावर ही भर द्यावा.
स्थूल व्यक्तींना वनौषधी तागाचे वरदान तागाची पाने थंड, स्निग्ध आणि त्वचा रोगनाशक असतात. तागाच्या बियांचे चूर्ण कोमटपाण्यातून घेतले असता स्थूलत्व कमी होते.स्थूल व्यक्तींनी म्हणून तर तागाचे बियांचे चूर्ण रोज अनाशेपोटी घ्यावे. तसेच स्थूल व्यक्तींचे हात-पाय चांगलेच सुजलेले असतात अशा वेळी तागाच्या पानांचे पोटीस सुजलेल्या भागांना लावावे, त्यानेही सूज कमी होण्यास मदत होते.तागाचे खोड उगाळून किंवा मूळी चूर्णाचा लेप द्यावा अथवा कोमट पाण्यात त्याचे चूर्ण घेतले तरी चालेल. स्थूलत्वावर ताग ही अशाप्रकारे उपयुक्त वनस्पती ठरली आहे.