- होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या अधिक नियंत्रण नसल्याने फिरताहेत शहरभर
पिंपरी – करोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरही अनेक करोनाबाधित होम क्वारंटाइनच्या नावाखाली घरातच थांबत आहेत. सद्यस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरामध्ये होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 350 आहे. या रुग्णांवर महापालिकचे नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणाचेच नियंत्रण नसल्याने हे बाधित रुग्ण राजरोसपणे शहरामध्ये फिरत आहे. त्याचा परिणाम रुग्णांची संख्या वाढण्यावर होत आहे. सद्यस्थितीत तीन हजारांहून अनेक बाधित करोनाचे “सुपर स्प्रेडर’ ठरत आहेत.
बाधित झाल्यानंतर घरामध्येच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यांची परिपूर्ण नोंद महापालिका प्रशासनाकडे नाही. तर लक्षणे नसलेले अनेक करोनाबाधितांचा शहरभर खुला वावर सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाने 1 लाख 8 हजारांचा आकडा पार केला आहे. तर 2 हजार 635 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोना चाचणी करण्यासाठी गेल्यानंतर त्याचा अहवाल लवकर येत नाही. त्यामुळे हजारो रुग्णांना घरी जाण्याचा सल्ला दिला जातो, तसेच काही रुग्ण “पॉझिटिव्ह’ आल्यानंतर “होम आयसोलेट’ होतात. लक्षणे असलेले रुग्ण घरात थांबत असले तरी लक्षणे नसलेल्या रुग्णांचा शहरात खुलेआम वावर सुरू आहे. करोनाबाबत त्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
तर दुसरीकडे महापालिका प्रशासनालाही करोनाचे गांभीर्य नसल्याचे समोर येत आहे. स्वतःच्या घरामध्ये क्वारंटाइन झालेल्या तीन हजारांहून अधिक रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेची कोणतीही यंत्रणा नाही. महापालिकेच्या सर्वेक्षण विभागाचे सर्वेक्षणही केवळ नावापुरतेच शिल्लक राहिल्याने कॉन्टॅक्ट टरेसिंगचाही बोजवारा उडाला आहे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम रुग्णसंख्येच्या वाढीवर होत असून, शहरात अशीच परिस्थिती राहिल्यास रुग्णसंख्येचा वेग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
रुग्णांचा पत्ताच नाही
अनेक ठिकाणी करोनाबाधितांची नोंदच ठेवली जात नाही. रॅपिड टेस्टचा अहवाल साध्या कागदावर लिहून दिला जातो. त्या रुग्णांचे पुढे काय झाले याचा पाठपुरावा केला जात नाही. अनेक वेळा ऍटिजेन व आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या केल्या जातात. ऍटिजेनचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णाला घरी पाठवले जाते. त्यानंतर “आरटीपीसीआर’च्या अहवालासाठी पत्ते देखील घेतले जात नाहीत. पुढे हे रुग्ण अनेक नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढत आहे.
“घर टू घर’ सर्वेक्षण नाहीच
घरातच उपचार घेणारे छुपे रुग्ण इतरांनाही संसर्ग करतात. तसेच प्रकृती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णालयात धाव घेतात. रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये “मायक्रो प्लॅनिंग’ करून सर्वेक्षण करणे आवयक आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून संसर्ग वाढणार नाही. मात्र महापालिकेच्या सर्वेक्षणाचा बोजवारा उडाला असल्याने शहरामध्ये अनेक रुग्ण घरातच आहेत, तर हजारो करोनाचे वाहक समाजामध्ये फिरत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी तोबा गर्दी
पिंपरी-चिंचवड शहरातील भाजी मंडई, बसथांबे, महापालिका तसेच मोठ्या आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. याठिकाणी अनेक नागरिक करोनाविषयक नियमांचे पालन करत नाहीत. याठिकाणी नागरिकांची तापमान तपासणी होत नाही. तसेच सॅनिटायजर, सामाजिक अंतराचे पालन आदी नियमांचे पालन केले जात नाही. या गर्दीमध्येच अनेक होम क्वांरटाईन असलेले रुग्ण फिरत असतात. त्यामुळे शहरातील करोनाचा संसर्ग दर कमी होण्याऐवजी सातत्याने वाढ आहे.
गृह विलगीकरणा असलेल्या रुग्णांना आपण फोन करून त्यांची विचारपूस करत असतो. त्यांना फोनच्या माध्यमातून उपचार सांगितले जातात. त्यानुसार रुग्ण फॉलो करतात. गृहविलगीकरणात असलेल्या एकाही रुग्णाला तीव्र लक्षणे नाहीत.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक वैद्यकीय अधिकारी.