भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अहमदाबादच्या कसोटीमध्ये इंग्लंडचा दारुण पराभव करून या मालिकेमध्ये 3 विरुद्ध 1 अशी आघाडी घेऊन कसोटी क्रिकेटच्या विजेतेपदाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील या मालिकेवर कसोटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणता संघ खेळणार हे ठरणार असल्याने या मालिकेला निश्चितच महत्त्व प्राप्त झाले होते.
नेहमीप्रमाणे पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर अंतिम फेरीत स्थान बनवण्याचे भारताचे प्रयत्न अयशस्वी होतात की काय, अशी शंका येत असतानाच उर्वरित तीन सामन्यांमध्ये इंग्लंडला धूळ चारून भारताने कसोटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या इंग्लंडमधील लॉर्डस मैदानावर न्यूझीलंडसारख्या गुणवान संघासोबत भारताला कसोटीचा विश्वचषक जिंकण्यासाठी लढावे लागेल. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय क्रिकेटची गुणवत्ता सर्वोच्च पातळीवर असल्यानेच कसोटी क्रिकेटच्या अंतिम फेरीतही प्रवेश करण्यात या संघाला यश आले आहे.
सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे आणि ट्वेंटी-ट्वेंटी असो फिफ्टी-फिफ्टी असो किंवा पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट असो या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवण्याची संधीही या निमित्ताने टीम इंडियाला प्राप्त झाली आहे आणि ही संधी कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघाने सोडता कामा नये. कसोटी क्रिकेटमध्ये ज्या देशांचे वर्चस्व आहे त्या देशांपैकी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अथवा दक्षिण आफ्रिका हे देश या स्पर्धेतून बाहेर पडले असल्याने न्यूझीलंडसारखा कसोटी क्रिकेटमध्ये थोडे कमी नाव असलेला संघ भारतासमोर उभा राहणार असला तरी कोणताही गाफीलपणा न दाखवता भारताला न्यूझीलंडचे आव्हान परतून दाखवावे लागणार आहे.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या न्यूझीलंडसाठी गमावण्यासारखे बाकी काहीच राहिलेले नाही. त्यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, ही नोंद त्यांच्यासाठी खूप आहे. पण भारताला मात्र हा विश्वचषक जिंकून क्रिकेटच्या सर्व स्पर्धांमधील विजेतेपदावर दावा सांगता येणार आहे. सध्याच्या भारतीय संघातील गुणवत्ता पाहता भारतासाठी हा पराक्रम फारसा अवघड आहे, असेही म्हणता येणार नाही. खरेतर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर ज्याप्रकारे भारतीय संघाने उसळी घेऊन इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले आणि सर्वच गोलंदाज-फलंदाज यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली, ती पाहता कामगिरीची हीच पातळी अंतिम सामन्यातही कायम राहण्याची आशा करायला हरकत नाही. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशातच धूळ चारणाऱ्या भारताने आपल्या दुसऱ्या फळीतील गुणवत्ताही दाखवून दिली होती.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्येही भुवनेश्वर कुमार, महंमद शमी, जडेजा यासारखे नेहमीचे खेळाडू अनुपस्थित असतानाही अक्सर पटेल, महंमद शिराज या सारख्या नवख्या खेळाडूंनी आपली उपयुक्तता सिद्ध केली, हेही विसरून चालणार नाही. कर्णधार विराट कोहलीच्या बॅटिंगचा बहर थोडाफार ओसरला असला तरी काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण भारताचा दुसरा एक गुणवान फलंदाज रोहित शर्मा आता कसोटी क्रिकेटमध्येही स्थिरावू लागला आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंत याने आपली फलंदाजीतील कौशल्य आणि उपयुक्तताही वारंवार सिद्ध केली आहे.
रवीचंद्रन अश्विन गोलंदाजीमध्ये मोठ्याप्रमाणावर उपयुक्त ठरत असतानाच संघाला गरज असताना फलंदाजीमधील कौशल्य त्याने दाखवून दिले आहे. जडेजाच्या अनुपस्थितीत वॉशिंग्टन सुंदर एका उपयुक्त अशा अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करत आहे. चौथ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरने ज्याप्रकारे फलंदाजी केली ती पाहता भविष्यात तो एक उपयुक्त अष्टपैलू फलंदाज म्हणून उदयास येईल याबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारण दिसत नाही. कसोटी क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेबाबतचे नियम करण्यात आले होते, त्या नियमांचा विचार करता जगातील बहुतेक सर्व प्रमुख देशांशी कसोटी क्रिकेटचा सामना करून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
गेली काही वर्षे भारतीय क्रिकेट संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्यानेच हे यश मिळाले आहे पण तरीही ऑस्ट्रेलियातील पहिला सामना असो किंवा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना असो, भारतीय खेळाडूंचा गाफीलपणा पराभवाला कारणीभूत ठरला हेसुद्धा विसरून चालणार नाही. कसोटी क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्धचा अंतिम सामना हा एकच असल्याने कोणत्याही प्रकारचा अतिआत्मविश्वास किंवा गाफीलपणा बाजूला ठेवूनच सामना करावा लागणार आहे. एक तर हा सामना लॉर्डस मैदानावर होणार असल्याने तेथे फिरकी गोलंदाजी कितपत उपयुक्त ठरेल ही शंका आहेच. दुसरीकडे न्यूझीलंडच्या फलंदाजांचा फिरकी खेळण्याचा चांगला अनुभव आहे. या अंतिम सामन्यासाठी संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापनाला फिरकी गोलंदाज, जलदगती गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू यांचे चांगले मिश्रण तयार करावे लागणार आहे.
मोठ्या प्रमाणावर गुणवान खेळाडू उपलब्ध असल्याने अनेक वेळा कोणाला निवडायचे, असा प्रश्न निर्माण होतो पण ह्या प्रश्नाचे उत्तर समाधानकारकपणे शोधण्यात आले तरच भारतीय संघ हमखास अंतिम फेरीमध्ये विजय मिळवू शकेल. हा अंतिम सामना होण्यापूर्वी भारतीय संघाला काही झटपट सामने खेळावे लागणार आहेत. म्हणजेच कसोटी क्रिकेटचा सराव खूपच कमी होणार आहे. त्याचा कोणताही परिणाम या अंतिम फेरीतील कामगिरीवर होणार नाही, याची दक्षता विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांना घ्यावीच लागेल.
कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट मानले गेले असल्यामुळे या क्रिकेटचा विश्वचषक जर भारतीय संघाच्या हातात आला तर भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थाने क्रिकेट जगतामध्ये “सम्राट’ हे पद भूषवू शकेल, हे लक्षात घेऊनच भारतीय संघाला या अंतिम सामन्यांमध्ये कामगिरी करावी लागेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हा विश्वचषक घेऊनच भारतात परत येईल अशा शुभेच्छा त्यांना द्यायला काहीच हरकत नाही.