पिंपरी -उष्ण वातावरणात काम करणाऱ्या कामगारांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी मोहननगर चिंचवड येथील ईएसआय (राज्य कामगार विमा रुग्णालय) रुग्णालयाने खबरदारी घेतली आहे. तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आरक्षित करण्यात आला आहे. तसेच गरज भासल्यास आणखी बेड वाढविण्यात येणार आहे. या बरोबरच अधिकचा त्रास जाणवू लागल्यास रुग्णालयाने संलग्नित केलेल्या इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता येणार आहे.
वेल्डिंगशी संबंधित तसेच इतर प्रत्येक कंपनीत उष्ण वातावरणात कामगारांना काम करावे लागते. त्याचा त्रास कामगारांना होण्याची शक्यता आहे. यामुळे ईएसआय रुग्णालय देखील सज्ज झाले आहे. रुग्णाला त्वरीत उपचार मिळावे म्हणून एक बेड आरक्षित करण्यात आला आहे. गरज भासल्यास या बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या एकही रुग्ण आढळला नसल्याचे ईएसआय रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
जनजागृतीकडे दुर्लक्ष
शहरात उष्माघाताचा त्रास असणारा एकही कामगार रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कंपन्यांना कोणतेही आवाहन ईएसआय रुग्णालयाकडून करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. एका बाजूला आरोग्य प्रशासन वारंवार आवाहन करत असताना ईएसआय रुग्णालयाने मात्र याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे
बांधकाम कामगारांचा समावेश नाही
खासगी बिल्डरांच्या बांधकाम साइटवर काम करणाऱ्या बांधकाम मजूरांना उन्हात काम करावे लागत आहे. त्यांना उष्माघाताचा अधिक त्रास जाणविण्याची शक्यता आहे. मात्र या कामगारांचा ईएसआय अंतर्गत समावेश होत नाही. त्यामुळे उपचारासाठी या कामगारांना इतर रुग्णालयाची वाट पकडावी लागत आहे. या कामगारांचा देखील ईएसआय अंतर्गत समावेश करण्याची मागणी कामगार संघटनांकडनू होत आहे.
उष्माघाताचा एकही रुग्ण अद्याप उपचार घेण्यासाठी आलेला नाही. स्वतंत्र एक बेड उपचारासाठी आरक्षित ठेवला आहे. गरज पडल्यास बेड वाढविता येतील. तसेच काही त्रास असल्यास रुग्णालयाने संलग्नित केलेल्या इतर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्याची सोय आहे.
– डॉ. वर्षा सुपे, निवासी वैद्यकीय अधिकारी.