पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून भाज्या, डाळी आणि गॅसचे दर वाढल्याने साधी पोळी-भाजी खायची झाल्यास तीस रुपये मोजावे लागत आहेत. याचा फटका शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी, कामगार आणि चाकरमान्यांना बसला आहे. पूर्वी ४५-५० रूपयांना मिळणारी घरगुती राईस प्लेट शहरात काही ठिकाणी ८० ते १०० रुपयांवर पोहोचली आहे. प्रत्येक खानावळीचे दर वेगळे आहेत. परिणामी खानावळीमध्ये जेवणाऱयांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.
पिंपरी चिंचवड नगरी ही औद्योगिक नगरी असून स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना शिक्षणाचे माहेरघर होऊ पहात आहे. शहरात एमआयडीसीमध्ये काम करणाऱया कामगारांची सख्याही मोठी आहे. तर, शिक्षणानिमित्त राज्य आणि देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण या खानावळीवर अवलंबून आहेत. सकाळी आणि संध्याकाळच्या जेवणाची सोय येथेच असते. काहीजण महिना मेस लावतात. तर, अनेकजण विविध कारणांनी खानावळीत जेवण करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाज्या, डाळी, गॅस यांचे दर वाढले आहेत. तसेच बहुतांशी भाज्यांच्या दराने शंभरी पार केली आहे.
त्यामुळे घरगुती राईस प्लेटचे दर ८० ते १०० रुपयांवर पोचले आहेत. तर, मांसाहारी थाळी १२० ते १४० रुपयांना मिळत आहे. विविध कंपन्या, दुकानात काम करणारे चाकरमानी अशा खानावळींमध्ये जेवण्यास येतात. दुपार व रात्रीचे जेवायचे झाल्यास एका माणसाला १६० ते २०० रुपये मोजावे लागत असल्याने आता बाहेर जेवणही परवडेनासे झाले आहे.
शहरात संत तुकाराम नगर, मासुळकर कॉलनी, खराळवाडी, शाहूनगर, निगडी, चिंचवडगाव, सांगवी, थेरगाव आदी परिसरात खानावळी असून खानावळीत शाकाहारी थाळी ८० ते १०० रुपये आहे. त्यात दोन चपात्या, दोन भाजी, वरण, भात, पापड, लोणचे, सलाड आदींचा समावेश असतो. काही ठिकाणी पापड, लोणचे, सलाड दिले जात नाही. तर, मांसाहरी थाळी १२० ते १४० रुपयांना असून त्यात चपाती, चिकन, बिर्याणी, सलाड आदींचा समावेश असतो. तसेच, महिना मेसचे दर २६०० ते ३००० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे जेवणासाठीच एवढा खर्च होत असेल तर, भागणार कसे असा प्रश्न आहे.
डाळी महागल्या
बहुतांशी डाळी-कडधान्यांचे दरवाढले आहेत. तुरडाळ, हरभराडाळ, मुगडाळीच्या दरात क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली. तसेच पालेभाज्यांनी शंभरी पार केली आहे. सिलिंडरचे दर वाढले आहेत. भाज्या, पालेभाज्या, कडधान्य तसेच कांदा-बटाटा, टॉमेटो यांच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. परिणामी खानावळीच्या दरात वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले.