पवनानगर, दि. 21 (वार्ताहर)-पवना पाटबंधारे विभागाच्यावतीने धरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांनी रोखले. पवना धरण क्षेत्रामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या कृषी पर्यटन केंद्राची तसेच तसेच इतर बंगल्यांची केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अटकाव केला. “आधी पुनर्वसन करा, मग इतर कामे करा’ अशी जोरदार मागणी केली.
गेल्या अनेक वर्षांपासून पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन प्रलंबित आहे. याबाबत शासन दरबारी व न्यायालयात न्यायासाठी धरणग्रस्त झगडत आहेत. गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी पर्यटन व्यवसायात वाढ झाली आहे. यामुळे स्थानिक धरणग्रस्त तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून याठिकाणी कृषी केंद्र उभारली आहेत.
या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी व स्थानिकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. संतप्त ग्रामस्थांचा उपविभागीय अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क झाल्यावर अधिकारी माघारी फिरले धरणग्रस्तांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात आगोदर पुनर्वसन, मगच इतर कामे करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.
यावेळी सरपंच नारायण बोडके, पवना कृषी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मोहोळ, उपाध्यक्ष किसन खैरे, सचिव रवी ठाकर, दत्ता ठाकर, अनिल तुपे, अशोक ठाकर, राजू ठाकर, सोपान मानकर, प्रकाश ठाकर, नवनाथ बोडके, विशाल ठाकर, श्रीकांत मोहोळ, शिवराम ठाकर आदी उपस्थित होते.
पर्यटनस्थळाचा दर्जा नसल्याने तोटे
निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या मावळ तालुक्याला पर्यटनस्थळाचा दर्जा नसल्याने शासकीय योजना व अनुदान मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी पावसाळ्याबरोबरच पर्यटकांची बारामाही गर्दी होत असते. पर्यटनस्थलाचा दर्जा नसल्याने पर्यटकांचा अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.
पवना धरण परिसरात धरणग्रस्त तरुणांनी कृषी पर्यटन केंद्र सुरु केली आहे यातुन रोजगार उपलब्ध झाला आहे प्रशासनाने पर्यटनाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत.
बाळासाहेब मोहोळ, अध्यक्ष, पवना कृषी पर्यटन विकास संस्था