पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) -घरातील विद्युत यंत्रणांच्या दुरूस्तीकडे केलेले दुर्लक्ष आगीच्या घटनांना निमंत्रण ठरत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सात महिन्यांत 400 आगीच्या घटना घडल्या आहेत. विद्युत यंत्रणांचा बिघाड, कचरा व इतर वस्तूंमुळे या घटना घडल्याचे अधिकारी सांगत आहेत. दुर्घटना घडण्याआधीच काळजी घेण्याचे आवाहन अग्निशमन विभागाचे अधिकारी करत आहेत.
दरवर्षी घरातील इलक्ट्रिक वस्तू, वीज यंत्रणांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. विद्युत केबल तुटलेल्या आहेत का ? विद्युत यंत्रणांमध्ये पाणी जाते का आदींची तपासणी करणे गरजेचे आहे. वारंवार शहरातील नागरिकांना आवाहन करूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश ठिकाणी हेच कारण असल्याचे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे.
तसेच घराच्या आवारात असणाऱ्या लाकडी वस्तू, कचरा विद्युत यंत्रणांजवळ ठेवला जातो. आग लागल्यास ती वाढत जाण्याला हे कारण ठरत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी, चिखली, भोसरी आदीसह भंगार दुकान असलेल्या परिसरात या घटना अधिक असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
अग्निशमन विभागाला आग लागल्याच्या घटनांबाबत तक्रारी दाखल होत आहेत. या मध्ये बहुतांश घटना घरात लाकडी वस्तू असल्याने झाल्याची कारणे आहेत. शहरातील इलेक्ट्रीक यंत्रणा तपासून घेणे गरजेचे आहे. – शहाजी चंदनशिवे, वरिष्ठ फायरमन, महापालिका.
आगीच्या घटनांची सात महिन्यांतील आकडेवारी
जानेवारी-25
फेब्रुवारी-70
मार्च-101
एप्रिल-77
मे-61
जून-42
जुलै-21