पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊन पाच वर्षे होत आली आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. या पाच वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 82 टोळ्यांमधील 633 सराईतांवर मोका (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायदा) अंतर्गत कारवाई केली आहे. तरी देखील शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलिसांना अपयश आल्याचे रोजच्या घटनांवरुन दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी जगताचा इतिहास रक्तरंजित आहे. रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव, प्रकाश चव्हाण टोळीचा म्होरक्या प्रकाश चव्हाण यांचे खून झाले होते. महाकाली टोळीचा म्होरक्या महाकाली याचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. मात्र त्यानंतरही संघटीत गुन्हेगारी सुरूच राहिली. यामुळे पोलिसांनी मोका कायद्याचा आधार घेत गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईस प्रारंभ केला.
सहा महिन्यांत द्विशतक
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यांत 19 टोळ्यांवर मोकाची कारवाई करीत 201 जणांना तुरूंगात पाठविले आहे. आत्तापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात असली तरी याच काळात भर दिवसा खून, खुनाचे प्रयत्न असे धक्कादायक गुन्हे घडले आहेत. तसेच सध्या गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात पिस्टल, कोयत्यांचा सर्रास वापर होताना दिसत आहे. यामुळे मोठी कारवाई करुनही शहरात भयमुक्त वातावरण दिसत नाही.
संघटित गुन्हेगारांची टोळी म्हणजे काय?
चार, पाच जण किंवा त्याहून अधिक यांनी एकत्रपणे येऊन केलेला गुन्हा म्हणजे संघटीत गुन्हा. पण हाच संघटित गुन्हा अनेक जण येऊन म्होरक्यामार्फत करतात तेव्हा टोळी निर्माण होते. या टोळीतून फुटून अनेक टोळ्या निर्माण होतात आणि त्यांच्यात अस्तित्व आणि वर्चस्वासाठी टोळीयुद्ध होते. या टोळ्या आणि त्यांच्या वर्चस्वाची झळ सर्वसामान्य नागरिकांनाही बसते.
टोळ्यांमध्ये अल्पवयीन व तरुणांची संख्या लक्षणीय
नव्याने निर्माण झालेल्या सोन्या काळभोर आणि रावण गॅंगमध्ये शाळा, महाविद्यालयात जाणारे तरुण आहेत. शाळा-महाविद्यालयातही “हा या गॅंगचा, तो ह्या गॅंगला ऍटच आहे’, अशी चर्चा ऐकायला येते. काही वाट चुकलेले तरूण योगयोगाने म्हणा किंवा भाई बनण्यासाठी, झटपट पैसा मिळविण्याच्या नादात या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सामील झाले आणि आयुष्याचा खेळखंडोबा करून बसले. अल्पवयीन मुलांमध्ये आणि तरुणांमध्येही वेगवेगळ्या गुंडांच्या चर्चा होतात. तर स्थानिक पातळीवरील गुंडांच्या शौर्याचे खोटे आणि रंजक किस्से मुलांमध्ये चघळले जातात.