पिंपरी – वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील जय मल्हार कॉलनीमधील दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये दोन सख्या भावंडांचा मृत्यू झाला. यामुळे गेल्या पाच महिन्यांत आगींच्या तीन घटनांमध्ये २० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
ललित अर्जुन चौधरी (वय 21), कमलेश अर्जुन चौधरी (वय 23) अशी मृतांची नावे आहेत. अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अडीच वाजताच्या अग्निशमन केंद्रास आगीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, प्राधिकरण, चिखली आणि थेरगाव उपअग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
विषारी वायू तयार झाल्याने बेशुद्ध
पहिल्या पत्र्याच्या शेडमध्ये गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीजमध्ये लाकडाची वखार होती. तर दुसऱ्या शेडमध्ये विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर फ्रेम तयार करण्याचा कारखाना होता. तसेच दोन्ही गोदामांमध्ये एका मोटार व दोन दुचाकी होत्या. आगीच्या धुरामुळे कार्बन डाय-ऑक्साइड तथा कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू तयार होऊन त्यामुळे दोन्ही भावंडे बेशुद्ध झाली. त्यानंतर त्यांचा होरपळून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता अग्निशमन दलाच्या सूत्रांनी व्यक्त केली. आसपासच्या इमारतींमधील नागरीकांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या.
पोटमाळा सर्वेक्षण आणि बर्न वॉर्ड कागदावर
पाच महिन्यांपूर्वी चिखली येथे हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शहरात असलेल्या दुकानांचे सर्वेक्षण करून कारवाईची घोषणा केली. मात्र पाच महिन्यांनंतरही अद्याप एकाही दुकानावर कारवाई झालेली नाही. तसेच शहरात बर्न वॉर्ड उभारण्याची घोषणा महापालिकेने केली. मात्र अद्यापही बर्नवॉर्डही कागदावरच आहे.
आडनावांचाही योगायोग
पाच महिन्यापूर्वी चिखली येथे हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या कुटुंबातील व्यक्तींचे आडनाव चौधरी होते. तर मंगळवारी पहाटे वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे लागलेल्या आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या दोन भावंडांचे आडनावही चौधरी आहे.