पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – गेल्या 9 महिन्यांमध्ये शहरातील 41 हजार वाहनचालकांनी सिग्नल तोडले आहेत. अशा नागरिकांवर वाहतूक पोलिसांनी तब्बल अडीच कोटींचा दंड ठोठावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सिग्नल तोडणाऱ्या या वाहनचालकांपैकी 34 हजार जणांनी हा दंड थकीत ठेवला आहे.
वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असतानाही सिग्नल तोडण्याची सवय सुटत नसल्याचे दिसून येत आहे.सिग्नलवर काही सेकंद थांबायलाही अनेक वाहन चालकांकडे वेळ नसतो. ते थेट सिग्नल तोडून पुढे जातात. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात होण्यासह वाहतुकीचा खोळंबा देखील होतो. सिग्नल तोडल्या प्रकरणी मागील नऊ महिन्यात 41 हजारांपेक्षा अधिक वाहन चालकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर ऑनलाइन माध्यमातून तब्बल अडीच कोटी रुपयांहून अधिकचा दंड आकारण्यात आला आहे. त्यातील साडेसात हजार जणांनी 41 लाखांचा ऑनलाइन दंड भरला असून 34 हजार जणांनी या दंडाकडे कानाडोळा केला आहे. दोन कोटी रुपये दंड अजूनही बाकी आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी दंडात्मक कारवाई देखील होत आहे. सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांना एखाद्याने रोखल्यास ते थेट त्या नागरिकाच्या अंगावर येऊन हमरीतुमरी करतात. शहरात रस्ते प्रशस्त असून चौकशी मोठमोठे आहेत. मुख्य चौकांमध्ये वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करतात. पण त्यांची नजर चौकवून काहीजण वाहने दामटतात.
“पीएमपी’ चालकही तोडताहेत सिग्नल
शहरात पीएमपीएमएलसाठी स्वतंत्र बीआरटी मार्ग तयार करण्यात आला आहे. बीआरटी मार्गावरील चौकाचौकांमध्ये बीआरटीसाठी स्वतंत्र सिग्नल देखील उभारले आहेत. पीएमपीएमएल चालक बीआरटी सिग्नल सुरू नसताना देखील बस पुढे नेतात. यामुळे देखील वाहतूक कोंडी होते. सिग्नल तोडल्याप्रकरणी सर्वसामान्य वाहन चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. तशीच कारवाई सिग्नल तोडणाऱ्या पीएमपीएमएल बस चालकांवर देखील करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.