मुंबई : वांद्रे येथील रेल्वे स्टेशनवर जमलेल्या गर्दीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर येत असतील तर हे काळजी करण्याचे कारण आहे. अशा घटना पुन्हा त्यांनी होऊ नयेत म्हणून दक्षता घ्यावी. तसेच अशा घटनांमुळे कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत होईल. केंद्र सरकार राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल असंगृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हि राज्य सरकारची जबाबदारी असून कामगारांची व्यवस्था करणे हे त्यांचे काम आहे. कामगारांना जेवण देणे, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. वांद्र्यात शेकडो नागरिक रस्त्यावर उतरत असतील तर हि गंभीर बाब आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करीत आहे. कोरोना विरुद्धची लढाई हि राजकीय नाही हे आतातरी लक्षात घ्यावे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज दुपारी 4 च्या सुमारास वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या नागरिकांची, मजुरांची मागणी होती. वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जामा मशिदीच्या जवळ ही गर्दी जमली होती. याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत.